Varun Gandhi
Varun Gandhi 
विश्लेषण

मोदी अन् शहा गप्प असताना भाजप खासदाराने टाकला 'ट्विटबॉम्ब'

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना (Farmers) चिरडत वाहनांचा ताफा निघून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप (BJP) नेत्यांनी मौन धारण केले असताना भाजप खासदारानेच हा व्हिडीओ ट्विट करुन सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यात चार शेतकरी (Farmers) आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, गृहराज्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावत आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असं म्हटलं आहे. त्यानंतर या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच या घटनेचा व्हिडीओ आता ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यातच आता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीच या घटनेचा व्हिडीओ ट्विट करुन सगळ्यांनाच धक्का दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा हा व्हिडीओ तुमच्या हृदयाला हेलावून टाकेल. पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन या गाड्यांचे मालक, त्यात बसलेले व्यक्ती आणि या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना शोधून त्यांना तातडीने अटक करावी.

जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. याचवेळी जपानच्या नवीन पंतप्रधानांचे स्वागत करणारे ट्विट मात्र, त्यांनी केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या घटनेवर ट्विट करण्यात आलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह मंत्रालयानेही याबाबत मौन धारण करीत ट्विट केलेले नाही.

शेतकरी आंदोलन करत असताना वाहनांचा ताफा त्यांच्या अंगावरून पुढे गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं शेतकरी संघटनांमधील रोष आणखी वाढला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत अजूनही शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्तीला अटक का केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. तसेच इतर नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT