sharad mohol, t. raja  Sarkarnama
विश्लेषण

Bjp News : भाजप आमदाराकडून केले जातेय गुन्हेगाराचे उदात्तीकरण; मुक्ताफळे उधळताना म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

Solapur News : महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सभ्य राजकीय परंपरेची चौकट गेल्या काही वर्षांत उद्धवस्त झाली आहे. राजकीय पक्षांचे, नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. महाराष्ट्राच्या समोर पुरोागामी असे बिरुद लावले जाते, पण त्यात आता फारसे तथ्य उरले नाही, हे दर्शवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत.

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थक्क करणाऱ्या अन विचार करायला भाग पाडणाऱ्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतांश घटना निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित आहेत. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावेळी तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळचे उदात्तीकरण करताना देशभक्ताची उपमा देत जी मुक्ताफळे उधळली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रसंगी भाजपचे आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात बोलताना तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी शरद मोहोळचे कौतुक करीत स्तुतीसुमने उधळली आहेत. दोन दिवसापूर्वीच कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे होते. शुक्रवारी त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला. मात्र आता शरदभाऊची हत्या झाली, ते हिंदुत्ववादी होते, त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवले. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा, अशा शब्दात टी. राजा यांनी शरद मोहोळचे तोंड भरून कौतुक केले.

यावेळी बोलताना टी. राजा यांनी गोरक्षण करणारा शरद मोहोळ हा माझा मित्र होता. हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली असे वक्तव्य केले. दुसरीकडे सर्वानी मिळून शरद मोहोळला परत पाठवा, अशी देवाकडे प्रार्थना करा असे आवाहनही त्यांनी केले. आमच्यातीलच काही मंडळी दुष्मन झाले आहेत. त्यांना कसं ओळखायचं? असा सवालदेखील त्यानी उपस्थित केला.

महाराष्ट्रमध्ये लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड या सर्व बाबतीत विचार करण्याची गरज आहे. आजचे हिंदु कुंभकर्ण होतं चालले आहेत. इथल्या हिंदुंची रक्षा करण्यासाठी आम्ही हैदराबादमधून यायचं का? तुम्हाला स्वतःची रक्षा स्वतः करावी लागेल, असे सांगत त्यांनी समाजाला चेतवण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे या मोर्चावेळी वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून आमदार नितेश राणेंनी जोरदार टीका केली. वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहिल, असे सांगत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले.

काँग्रेसने केला निषेध

सोलापूरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेकीचा व वादग्रस्त वक्तव्यचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. धर्म आणि जातीवर कोणी तेढ निर्माण करत असेल तर आपण त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देत या घटनेचा निषेध केला आहे.

भाजपमध्ये एकाकी

भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा (T. Raja Singh) यांच्या या वादग्रस्त विधानाचे भाजपमधील कोणीच समर्थन केल्याचे दिसत नाही अथवा त्यांची बाजू घेत कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे येत्या काळात या दोन जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टी. राजा, राणे यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा

सोलापुरात झालेल्या या घटनेचा सर्वस्थरातून निषेध केला जात असल्याने व सत्ताधारी पक्षांवर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला. त्यामुळे याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांच्यासह इतरांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हजारोंचा जनसमुदायासह निघालेल्या या मोर्च्याप्रसंगी रस्त्यावर हुल्लडबाजी करून दगडफेकही करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्याचीही दखल घेऊन गुन्हा दाखल केला.

विरोधी पक्षांना मिळाली घेरण्याची संधी

भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा, नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीला भाजपला घेरण्याची संधी चालून आली आहे. येत्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाकडून या मुद्दयावरून भाजपला घेरण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT