Rajni Patil
Rajni Patil  sarkarnama
विश्लेषण

राज्यसभा निवडणूक बिनविरोध : भाजपचा आकडा अजूनही 106 च्या पुढे नाही

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : निवडणूक लढविण्यावर पक्षश्रेष्ठी ठाम असल्याचे सांगून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने सोमवारी अखेर माघार घेतली आणि काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या बिनविरोध राज्यसभेच्या सदस्या झाल्या. ‘माझ्यावरील जबाबदारी नेटाने पार पाडण्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक नको, म्हणून अर्ज मागे घेतल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यानुसार भाजपने अर्ज मागे घेतला. पण भाजपचे विधानसभेतील छुपे संख्याबळ फारसे वाढलेले नाही, असाही याच अर्थ निघालेला आहे.

भाजप नेते हे राज्यात राजकीय चमत्कार घडेल, महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे सांगत असतात. त्यामुळे राज्यसभा निवडणूक किंवा अर्थसंकल्पावरील मागण्या अशा वेळी सत्ताधारी पक्षाला झटका देण्याची क्षमता भाजपकडे आली आहे का, अशी शंका सत्ताधारी पक्षाला येते. रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक त्यामुळेच होत नाही, अशीही शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. पण प्रत्यक्षात भाजपचे जेवढे अधिकृत आमदार आहेत तेवढीच ताकद सध्या भाजपकडे असल्याचे विविध अधिवेशनात आणि आता राज्यसभेच्या निवडणुकीत दिसले आहे. त्यामुळे 144 हा बहुमताचा आकडा काढण्यासाठी भाजपची पूर्ण तयारी नाही किंवा महाविकास आघाडी भक्कम असल्याने भाजपला तशी संधी नाही, अशा दोन्ही बाबी स्पष्ट होत आहेत.

विधानसभेतील भाजपच्या बारा निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार आहे की नाही, याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने रंगली होती. सत्ताधारी आघाडीतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार असा अधिकार नसतो. पण भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे हा विषय नेत विधानभवनाच्या बाहेर बूथ उभारून या बारा आमदारांच्या मतदानाची सोय केली होती. त्यामुळे ही निवडणूक होणार की काय आणि भाजप त्यात धक्का देणार काय, असे चर्चिले जाऊ लागले होते. मात्र तसे काहीच घडले नाही.

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पाटील आणि भाजपच्या संजय उपाध्याय यांनी अर्ज दाखले केले होते. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देऊ नये, असा काँग्रेसचा आग्रह होता; तरीही 'पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याचे माघार नाही, असे भाजप नेत्यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही 'प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्य निर्णय घेतील,' असे फडणवीस यांनी सांगितले होते.. त्यामुळे निवडणूक होणार का, याबाबत उत्सुकता होता. निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे, सोमवार निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उपाध्याय यांनी अर्ज मागे घेतला. उपाध्याय म्हणाले, "पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसचे नेते दोन वेळा वरिष्ठांना भेटले. सर्व पातळ्यांवर चर्चा करूनच माघार घेतली आहे. अर्ज दाखल करण्याआधी आमची भूमिका वेगळी होती."

महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमधील सध्याचा राजकीय संघर्ष पाहता ही निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, परंपरा म्हणून पटोले, थोरात, फडणवीस यांना भेटले; तर अन्य नेत्यांशी त्यांची चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांत भाजपने अपेक्षित सहकार्य केल्याने काँग्रेस नेत्यांचे त्यांचे आभार मानले आहे. अडचणीच्या काळात अशा प्रकारचे सहकार्य राहील, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या 12 आमदारांचे विधानसभेतील निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा होती. काॅंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली. पण आगामी हिवाळी अधिवेशनात या बारा आमदारांबाबत काही निर्णय होणार का, याकडे आता लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT