Tamil Nadu Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रमुकच्या युतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घोषणा केली. प्रसारमाध्यमांसमोर ही घोषणा करताना शहांच्या उजव्या बाजूला AIADMK चे प्रमुख पलानीस्वामी आणि डाव्या बाजूला के. अण्णामलाई बसले होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत अण्णामलाई यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर एकदाही दिसली नाही. एरव्ही विरोधकांना सळो की पळो करणाऱ्या अण्णामलाई यांना शहांनी आधीच गप्प केलं होतं.
अण्णामलाई हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या 40 वर्षीय नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. काही महिन्यांतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच मन जिंकलं. सत्ताधारी डीएमकेसह अण्णा द्रमुकवर बरसणारा तगडा नेता भाजपला मिळाला होता.
भाजपनेही त्यांना मोठं केलं. एवढं मोठं केलं की, 2026 च्या विधानसभा निवडणुकीत तेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार, असेच राज्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटू लागलं. अण्णामलाई यांनीही स्वत:वर आसूड ओढत आपली निष्ठा दाखवून दिली. पण भाजप नेतृत्वाच्या मनात वेगळंच सुरू होतं. अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून निरोप देण्याची वेळ पक्षनेतृत्वाने निश्चित केली. ही वेळ अण्णामलाई यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली.
लोकसभा निवडणुकीत अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मतांच्या टक्केवारी आकडा दोनअंकी केला. त्याआधीच्या निवडणुकीत भाजपला 7.7 टक्के मते मिळाली होती. पण एकट्याने निवडणूक लढूनही अण्णामलाईच्या नेतृत्वाखाली भाजपला 11 टक्के मते मिळाली. अण्णामलाई यांच्यासह भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी मतांमध्ये झालेली वाढ भाजपच्या अपेक्षा वाढवणारी होती. पण विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने एकट्याने निवडणूक न लढवता जुन्या मित्रासोबत आघाडी करावी, असे भाजपमधील अनेक नेत्यांना वाटत होते. अण्णाद्रमुकच्या नेत्यांचीही हीच इच्छा होती. पण अण्णामलाई त्यामध्ये अडसर ठरत होते. त्यांचा डीएमकेसह अण्णाद्रमुकला असलेला विरोध सर्वश्रृत आहे. त्यामुळेच त्यांना हटवल्याशिवाय युती होणार नाही, याची खात्री मोदी-शहांना पटली.
अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शहांची दिल्लीत जाऊन भेट घेत त्याचे संकेत दिले होते. अखेर शुक्रवारी शहांनी तमिळनाडूमध्ये जाऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पण योगायोग बघा, ही घोषणा करण्याआधी तमिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष बदलाची सुरूवात करण्यात आली. अर्ज मागवण्यात आले. अण्णामलाई आणि इतर नेत्यांच्या शिफारशीने एकाच नेत्याचा अर्ज आला. साहजिकच ते नाव अंतिम होणार, हे निश्चित. पण पत्रकार परिषदेपर्यंत त्याची घोषणा झाली नव्हती.
अण्णामलाई यांचे तोंड बंद करून शहांनी पत्रकार परिषद घेतली. अण्णामलाई अजूनही प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणूनच माझ्या शेजारी बसल्याचे शहांनी यावेळी बोलून दाखवले. पण अण्णामलाई यांचे भाजप आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना विरोध असलेल्या मतदारांमध्ये अण्णामलाई यांच्याविषयी निर्माण झालेली आत्मीयता एव्हाना शहांच्या लक्षात आली असावी. त्यामुळे त्यांना सोशल मीडियातून अण्णामलाई यांच्या कामाचे कौतुक करणे भाग पडले.
प्रदेशाध्यक्षपदासाठी नैनार यांचा एकट्याचाच अर्ज आल्याचे सांगताना शहांनी अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून अद्वितीय योगदान दिल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या संघटनात्मक शैलीचा राष्ट्रीय पातळीवर उपयोग होईल, असे संकेतही त्यांनी दिले. हे करण्यामागे अण्णामलाई यांच्या समर्थकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न शहांनी केला. पण खरंतर त्यांची अण्णामलाई यांना हटवून अण्णाद्रमुकशी आघाडी करण्याची त्यांची चाणक्यनीती फसल्याचे तर हे संकेत नाही ना, अशी शंका वाटावी, एवढं महत्व त्यांच्या ट्विटला आहे. कारण यापूर्वी कधीही एखाद्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्याबाबतची प्रक्रिया आणि अजूनही पदावर असलेल्या प्रदेशाध्यक्षांविषयी ते मावळते होण्याआधीच कौतुकाचा भडिमार करणारे ट्विट शहांनी कधीच केले नव्हते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.