Farmers Protest
Farmers Protest Sarkarnama
विश्लेषण

सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद नाही, मग लाखो कोरोना बळींचा आकडा कसा मिळवला?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात (farm Laws) मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना (Farmers Protest) दरम्यान 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण या शेतकऱ्यांच्या मृत्यूची मोदी सरकारकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबतचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूची सरकारकडे नोंदच नसल्याचे उत्तर दिलं आहे. त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची कबुली दिली आहे. एकाही मृत्यूची नोंद नसल्याने मदत देण्याचा प्रश्न उद्गभवत नाही, असंही त्यांनी या उत्तरात स्पष्टपणे म्हटलं आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरानंतर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारकडे जर 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती नसेल तर त्यांनी कोरोना महामारीच्या काळात मृत्यू झालेल्या लाखो जणांची माहिती कुठून गोळा केली. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सुमारे 50 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. पण सरकारकडे केवळ चार लाख मृत्यूची नोंद आहे, अशी टीका खर्गे यांनी केली.

हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मग याबाबत काहीच माहिती नाही, असं सरकार कसे म्हणू शकते, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. हमीभावचा कायदा व मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याशिवाय मागे हटणार नाही. यावर संघटना ठाम आहेत. विरोधी पक्षांनीही त्यांच्या सुरात सुर मिसळला आहे. आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाचा दावा केला जात आहे.

सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. हवामान, आजारपण, आत्महत्या, अस्वच्छता आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारने लोकसभेत दिलेल्या उत्तरामुळे शेतकरी संघटना आंदोलन तीव्र करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने चर्चेसाठी पुढे यावे, असं संघटनांनी यापूर्वीच म्हटलं आहे. पण अद्याप त्यावर सरकारकडून कोणतीही हाचचाल करण्यात आलेली नाही.

संयुक्त किसान मोर्चाची येत्या चार तारखेला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती व भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह पंजाब व इतर राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात उतरणार असल्याचे काही शेतकरी नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. या बैठकीमध्ये त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT