<div class="paragraphs"><p>BJPand Congress</p></div>

BJPand Congress

 

sarkarnama

विश्लेषण

राणेंची मुलासाठी माघार? थेट राजकीय निवृत्तीचा टाकला बॉम्ब

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. यातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी त्यांचे पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. यानंतर 24 तासांतच काँग्रेसने प्रतापसिंह राणेंना तिकीट दिले होते. आता राणेंनी राजकीय निवृत्तीचा बॉम्ब टाकल्याने राजकीय भूकंप झाला आहे.

काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलतानाच प्रतापसिंह राणे यांनी निवृत्तीचा बॉम्ब टाकला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, मी राजकारणात सुमारे 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आता मला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मला आता वाटत आहे की मी आराम करून नव्या पिढीला संधी द्यावी. गोवा प्रगतीशील राज्य असून, तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा 21 डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. प्रतापसिंह राणे हे 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती.

गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या या लढाईची चर्चा रंगली होती. पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पोरीम मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी पोरीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते. पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. आता राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT