Indapur News : कॅबिनेट कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या रूपाने अनेक वर्षानंतर पुणे जिल्ह्याला कृषी मंत्रिपद मिळाले आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी ते कृषी मंत्रिपदी निवड झालेल्यामध्ये नाशिक जिल्ह्यांतील दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे, बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे या तीन नेत्यांचा समावेश असून यानंतर दत्तात्रेय भरणे (Datttray Bharne) चौथे आमदार ठरले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची २१ फेब्रुवारी १९७५ रोजी मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून निवड झाली होती. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी ही राज्यकृषिमंत्री पद भूषवले होते.
इंदापूर तालुक्यातील भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसतानाही शेतकऱ्यांचा मुलगा ते राज्याचे कृषिमंत्री होण्याचा बहुमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून भरणे यांची राज्यामध्ये ओळख आहे.
इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे शेतकरी कुंटुबातील साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. भरणे कुंटूबाला कसलाही राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये २०२४ मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. गुरुवारी (ता.३१) रोजी भरणे यांच्याकडे राज्याच्या कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
१९९२ साली भवानीनगर मधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदापासुन त्यांच्या राजकीय कारर्किदीला सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. छत्रपती कारखाना व बॅंकेच्या संचालक पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी केला.
२००१ साली जिल्हा बँकेचेअध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला. यानंतर २००३ ते २००८ पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. २०१२ साली भरणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. यानंतर भरणे यांनी राजकारणामध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.
इंदापूर (Indapur) तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली. पाच वर्षामध्ये विरोधी पक्षाचा आमदार असताना ही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. विकासाच्या जोरावर २०१९ च्या भरणे यांनी विधानसभा जिंकली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. यावेळी सहा खात्याच्या जबाबदारी यशस्वीपणे संभाळली. २०१९ ते २०२४ पर्यंत तालुक्यामध्ये ६२०० कोटी रुपयांचा विक्रमी निधी खेचून आणला.
२०२४ मध्ये भरणे यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रीक केली. महायुतीच्या मंत्रीमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी होती. गुरुवारी (ता.३१) रोजी त्यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार देण्यात आला.
आगामी काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्री वर्णी लागताच भरणे यांनी सांगितले. पण या भरणे कुटुंबाची शेतकरी कुटुंंब अशी ओळख आहे. त्यांचे चुलते भगवानराव भरणे व वडील विठोबा भरणे हे हाडाचे शेतकरी होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.
राज्याचे कृषिमंत्री झाल्यानंतर भरणे म्हणाले, मी स्वतः शेतकरी असल्याने मला शेतकऱ्यांच्या व्यथा माहित आहेत. त्यामुळे या खात्याचे मंत्रिपद मिळाल्याचा नक्कीच आनंद वाटत आहे. मात्र, हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी माझे आई गिरीजा,वडील विठोबा व चुलते भगवानराव भरणे पाहिजे होते असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.