CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, 
Dhananjay Munde
CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Dhananjay Munde Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : फडणवीसांनी जपानमधून एकनाथ शिंदे, अजित पवार अन् मुंडेंना 'असा' घातला कोलदांडा

रश्मी पुराणिक

Mumbai News: कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप कमी करण्यासाठी आणि विरोधकांनी टाकलेला घेरा सोडविण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने दिल्ली गाठली. परंतु, चाणक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानहून फासे फेकत मित्रपक्षांना कोलदांडा घातल्याचे कांद्याच्या दरवाढीबाबतच्या एकूण घटनाक्रमाहून दिसते.

कांदा भाववाढीचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला भेटू नये, याची काळजी घेतानाच फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही तुमच्याकडे पद असले तरी भाजपच 'बिग बॉस' असल्याचे दाखवून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून कांद्याच्या भाववाढी संदर्भातील ट्वीट करत जाहीर केले.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याचे दर कोसळले. निर्यात शुल्क वाढवल्याने जेएनपीटी बंदरावर कांद्याचे सुमारे १२० हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. परिणामी राज्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. कांद्याचे दर पडताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी सरकारवर निशाणेबाजी केली. तर शेतकऱ्यांमधून संताप आणि आंदोलनांना देखील सुरुवात झाली.

या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जपानमध्ये आहेत. दरम्यान, अगोदरच सर्वसामान्यांमध्ये नव्या राजकीय समीकरणामुळे असलेला तिटकारा आणि त्यात सर्वच घटकांशी निगडित असलेल्या कांद्याचे भाव यामुळे सरकार घेरले जात असल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आघाडी घेत दिल्ली गाठली.

कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी कांद्याची वाढीव भावाने होणारी संभाव्य खरेदी याबाबत माहिती देताच दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कांदा प्रश्नी तोडगा काढल्याचे जाहीर केले.

यासाठी थेट जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियूष गोयल यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि काही वेळापूर्वीच कांदा प्रश्नी तोडगा काढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे मित्र असले तरी कांदा भाववाढीचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मिळू नये, यासाठी फडणवीसांनी थेट जपानमधून फासे आवळले आणि मित्रपक्षांना थेट जपानमधून कोलदांडा घातल्याचे राजकीय जानकरांचे मत आहे.

केंद्र सरकार शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. कांद्यावरून शेतकऱ्यांची झालेली अडचण सोडवण्यासाठी आणि सरकारची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री सरसावले. यात फडणवीसांनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे धनंजय मुंडे हे कांदाप्रश्नी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. मुंडेंनी गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट जपानवरून ट्विट करून राज्यातील चिघळलेल्या कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

कांद्यावरून झालेली कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सरसावल्याचे दिसून आले. यात फडणवीसांची आपणच मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढल्याचा दावा केला. तर कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने राज्यातील दोन मेट्रिक टन कांदा दोन हजार ४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच फडणवीसांनी सगळा तपशील जाहीर करत भाजपच 'सुपर बॉस' असल्याचे दाखवून दिले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT