Sindhudurg Politics News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून येथे 3 नगरपालिकांसह 1 नगरपंचायतीसाठी लढत होणार आहे. पण हा जिल्हा कधी काळी शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक या जोडगोळीसह दीपक केसरकर यांनी शिवसेनेचा किल्ला अभेद केला होता. पण शिवसेना फुटी त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालाने येथील राजकीय समिकरणे पालटली आहेत. येथे आता भाजपचा एक खासदार, एक आमदार आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. जे सध्या महायुतीचे म्हणजेच सत्ताधारी आहेत. यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत विरोधक असणाऱ्या राऊतांसह नाईक यांची सध्याची स्थिती ही शुन्यातून करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी सुरूवातचही आरंभ है प्रचंड अशी राहणार आहे.
कधी काळी जिल्ह्याची ओळख ही शिवसेनेचा बाल्लेकिला अशी होती. पण आता येथे नारायण राणेंसह त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी पकड मजबूत केली आहे. राणे स्वत: भाजपचे खासदार असून नीतेश राणे भाजपचे आमदार असून ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर त्यांचे मोठे सुपुत्र नीलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनीही येथे संजू परब यांना आपल्या सोबत घेत मोठी ताकद निर्माण केली आहे. तसेच दीपक केसरकर यांनी आपल्या गटाच्या जोरावर सावंतवाडीत आपण बोलू ती पूर्व दिशा असे समिकरण निर्माण केलं आहे. यामुळे येथे होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा पेपर ठाकरे गटासाठी सोपा असणार नाही.
जिल्ह्यात सांवतवाडी, वेंगुर्ला आणि मालवन अशा तीन नगरपालिका असून कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ आणि दोडामार्ग अशा 5 नगरपंचायती आहेत. ज्यापैकी देवगड, वैभववाडी, दोडामार्ग आणि कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. फक्त कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होणे बाकी आहे. तसेच सांवतवाडी, वेंगुर्ला आणि मालवन अशा तीन नगरपालिकांचीही निवडणूक झालेली नाही. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या पद्धतीने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीची तयारी सुरू केली आहे.
कणकवली नगरपंचायतीत 17 जागांसाठी निवडणूक लागणार असून हा राणेंचा गड आहे. तर वैभव नाईक यांना मोठा ताकद लावावी लागणार आहे. मागील वेळीही येथे सत्ता राणेंच्या हाती होती. आताही महायुतीचे सरकार आणि मुलगाच पालकमंत्री असल्याने त्यांच्याचकडे सत्ता राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता. येथे 17 पैकी जवळपास 15 जागा या राणे जिंकतील तर फक्त 2 जागाच वैभव नाईक बाजी मारतील अशी स्थिती आहे. कारण येथे वैभव नाईक यांचे चुलत बंधू सुशांत नाईक हे ठाकरे गटाची खिंड लढवत असून त्यांना सत्तेत नसणारे वैभव नाईक रसद पुरवतील. या रसदीच्या जोरावर ते 2 जागां किंवा त्यापेक्षा अधिक एखादी जागा जिंकू शकतील.
अशीच स्थिती तीनही नगरपालिकांमध्ये असून येथेही थेट लढत महायुती विरोधात महाविकास आघाडी होईल. सध्याची स्थिती पाहता येथे सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण येथे भाजपची ताकद अधिक असून दोन नंबरवर शिंदेंची शिवसेना आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आणि विरोधात अणारी ठाकरेंची शिवसेना असेल. येथे काँग्रेस, शदर पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणावी तशी दखल घेण्यासारखी नाही. पण या दोन्ही गटांची मदत घेतल्यास भाजपला राष्ट्रवादी (अजित पवार) आणि ठाकरे गटाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होऊ शकते.
तिन्ही नगरपालिका या विस्तारीत जाणाऱ्या शहरांच्या असल्याने येथे सध्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत निवडणुकीसाठी उमेदवारांची कमी नाही. याचाच फायदा निवडणूक जाहीर झाल्यावर ठाकरे गटाला होऊ शकतो. सध्याच्या स्थितीत ठाकरे यांच्या शिवसेनेकडे कार्यकर्ते आहेत. पण चेहरे नाहीत अशी आहे. पण निवडणूक जाहीर होताच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सी खेच पाहायला मिळेल. यात काहींना संधी मिळेल तर काहींचा पत्ता कट होईल. यामुळे नाराजांचा मार्ग शिवसेना ठाकरे गटाकडे वळेल. यामुळे जुन्यांसह नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील.
सावंतवाडी हा दीकप केसरकर यांचा बालेकिल्ला असल्याने ते आपला गड राखण्यासाठी भाजपबरोबर डील करतील. यात विरोधकांना धूळ चारण्यासाठी आता त्यांना संजू परब यांचीही मदत होईल. संजू परब हे कधी काळी केसरकर यांचे कट्टर विरोध होते. ते नगराध्यक्ष ही राहीले असून केसरकरांच्या विरोधात त्यांनी निधानसभेला दोन वेळा शड्डू ठोकला होता. पण काहीच महिन्यांच्याआधी त्यांनी नितेश राणेंच्या बरोबर जाण्याचा पक्का निर्णय करत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. ज्यामुळे आता केसरकर यांची ताकद वाढली आहे.
येथे भाजपचा वर्चस्व राहण्याची शक्यता असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी मोठी फिल्डींग लावतील. ते नितेश राणे यांचेही जवळचे मानले जातात. येथे महायुती म्हणून नाही तर स्वबळाचा नारा दिल्यास दीपक केसरकर यांना तोटा होऊ शकतो. कारण भाजप अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न करेल.
मालवण ही नगरपालिका मालवण मतदारसंघात येते असून तो कधी काळी वैभव नाईक यांचा गड होता. पण नीलेश राणेंनी येथे वैभव नाईक यांचा पराभव करत शिवसेनाही फोडली आहे. ज्याचा फायदा आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत होण्याची संभावणा अधिक आहे. येथे पालिका निवडणुकीत थेट लढत ही विधानसभेप्रमाणेच वैभव नाईक-विरोधात नीलेश राणे अशीच होईल. जी अंडरकरंट असेल....
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.