Abdul Sattar, Raosaheb Danve  Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti News : सुपडासाफ, पाडापाडीच्या भाषेला महायुतीत आता ब्रेक लागणार का ?

अय्यूब कादरी

Mumbai News : भाजपचे रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा सुपडा साफ करणार, अशी भाषा सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी वापरली होती. हरियाणा निवडणुकीच्या निकालाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट नमते घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकमेकांचा सुपडासाफ करण्याची, पाडापाडी करण्याची भाषा महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू आहे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अब्दुल सत्तार यांच्यात हा वाद पेटलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बसलेल्या धक्क्यातून न सावरलेल्या महायुतीसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपला दिलासा मिळाला असून, त्यानंतर आता महायुतीतील अंतर्गत वाद थांबतात की सुरूच राहतात, हे महत्वाचे ठरणार आहे. (Mahayuti News)

लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. सिल्लोड हा मंत्री अब्दुल सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून दानवे 25 हजार मतांनी पिछाडीवर राहिले. लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मदत केली, असे सत्तार यांनी उघडपणे सांगितले होते. त्यानंतर या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्षही एकमेकांना भिडत आहेत. एकमेकांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले आहेत, बंदही पुकारून झाले आहेत.

मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागा आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली. उर्वरित सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. एक जागा जिंकल्यामुळे शिंदे गटाने भाजपवर कुरघोड्या सुरू केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवेंच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्वतःच सांगितले होते. महायुतीत असतानाही भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याचे कारण काय असावे? हे मात्र समोर आलेले नाही.

महायुतीतील एक मंत्री भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतो, हे सर्व काही आलबेल नाही, हे दर्शवणारे आहे. यातून निर्माण झालेला वाद भलताच पेटला आहे. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनचे आमदार आहेत. आपल्या विरोधात निघालेल्या मोर्चांमुळे चिडलेल्या सत्तार यांनी संतोष दानवे यांचा सुपडा साफ करण्याची भाषा केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही असाच इशारा दिला आहे. शिंदे गटाने एका अर्थाने भाजपची कोंडी करण्याचाच प्रयत्न चालवला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपातही शिंदे गटाने लवचिक भूमिका घेतल्याचे दिसत नाही. भाजपचे 105 आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आलेले आहेत. अजित पवारही 40 आमदार घेऊन महायुतीत आले आहेत. सर्वाधिक आमदार असूनही उपमुख्यमंत्रिपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आधीच नाराजी आहे.

भाजपला विधानसभेच्या 160 जागा हव्या आहेत आणि शिंदे गटही 100 जागांवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थिती अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय करायचे, त्यांना किती जागा द्यायच्या, असा प्रश्न भाजपसमोर आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपचा उत्साह, आत्मविश्वास वाढला आहे. त्या निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर किती परिणाम होईल किंवा होणार नाही, हा भाग वेगळा असला तरी भाजपचे मनोधैर्य वाढले आहे, हे नाकारता येत नाही. भाजप आता शिंदे गटाच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांच्या भाषेत बदल होणार की नाही, हे महत्वाचे ठरणार आहे.

हरियाणाच्या निकालामुळे भाजप 150 पेक्षा अधिक जाागा लढवण्यार ठाम राहणार आहे. उर्वरित जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीसह काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही समाधान मानावे लागणार आहे. 100 जागा लढवण्यावर ठाम असलेल्या शिंदे गटाला हे मान्य होणार आहे का, की भाजप पुन्हा दोन पावले मागे घेणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटात सुरू झालेल्या शीतयुद्धात आता भाजपची बाजू वरचढ दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांचे उमेदवार ठरवण्यातही भाजपचा हस्तक्षेप वाढलेला होता. जागावाटपातही भाजपने बाजी मारली होती, मात्र त्याचा फटकाच बसला. तशी परिस्थिती विधानसभेला उद्भवू नये, यासाठी शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत 100 जागांची मागणी केली होती. हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर भाजप पुन्हा एकदा वरचढ होणार आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील तिन्ही पक्ष कसे वागतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT