Uddhav Thackeray-Eknath Shinde-Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं हातचं राखून वागणं; भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढविणारं...

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर कट्टर वैऱ्यासारखे उभे आहेत. एकमेकांवर होणाऱ्या जहरी टीकेमुळे त्यांच्यातील दरी अधिक रुंदावत चालली आहे. भविष्यात हे दोघे एकत्र येतील, अशी शक्यता धूसर होत चालली आहे. ठाकरे गटाने शिंदे गट जवळ येण्याची दारेच बंद केली आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून हातचं राखूनच एकमेकांवर तीही सौम्य भाषेत टीका केली जात आहे. त्यामुळे हे दोन्ही गट भविष्यात एकमेकांना दारं उघडी राहतील, अशीच भूमिका घेताना दिसत आहे. (Due to the role of two factions of NCP, the tension between BJP-Shinde faction increased)

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटांकडून शिंदे गटावर पहिल्या दिवसापासून प्रहार सुरू आहे. शिंदे गट बाहेर पडल्याचे शिवसेना नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. खासदार संजय राऊत यांची ‘खोक्याची’ भाषा ते उद्धव ठाकरेंनी दिलेली ‘गद्दारांची’ उपमा यावरूनच दिसून येते. ठाकरे गट प्रत्येक गोष्टीत शिंदे गटावर तोंडसुख घेताना दिसत आहे.

शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. मात्र, राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. तशीही ती असणेही स्वाभाविक आहे. कारण शिवसेना ही कायम जहाल भाषेसाठी ओखळली जाते, तर राष्ट्रवादी ही संयत भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. तातडीने ‘आरे’ला ‘कारे’ म्हणणारी संस्कृती काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीत नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संयम राखत बंडखोराविरोधात नामोल्लेखही टाळतात. खुद्द शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत, असं उत्तर देत, भाजप आणि शिंदे गटाचीही गोची केली आहे. पवारांच्या या वक्तव्याने भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचे कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले. पण, बंडखोराविरोधात कमी आणि भाजप व मोदीविरोधात जास्त आक्रमक दिसतात. येवला, बीड, सातारा आणि कोल्हापुरात त्यांच्या धडाकेबाज सभा झाल्या. या चारही सभेत त्यांनी बंडखोरांविरोधात मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येते. येवला येथील सभेत तर त्यांनी भुजबळांच्या उमेदवारीवरून जनतेची माफी मागितली. कोल्हापुरात मुश्रीफ यांच्या भगिनींच्या भूमिकेचे कौतुक केले. मुश्रीफ यांना तो टोलाच होता. केवळ अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मला पटली नसल्याचं पवार यांनी कोल्हापुरात सांगितले.

शरद पवार यांच्या सभेला उत्तर म्हणून अजित पवारांच्या सभा सुरू आहेत. पण, अजित पवारही पवार यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आहेत. केवळ मोदींची विकासात सुरू असलेली घोडदौड, सत्तेत राहून अजितदादा काय करू शकतात? हेच ते पटवून लोकांना देत आहेत. आमच्या जाण्यामागे पवार साहेबांचा हात आहे, अशी चिखलफेक अजितदादा करताना दिसतात. तर मुश्रीफ हे देखील पवार आमचे दैवत आहेत, असं बोलत त्याच्यावर टीका करण्याचे टाळतात.

खरे तर या दोघांच्या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे गटाची गोची झाली आहे. शिवसेना फुटल्यानंतर गावागावांत तयार झालेले दोन गट आजही संतप्त दिसतात. मात्र, राष्ट्रवादीतील कार्यकर्ते कुल असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीवर विश्वास कसा ठेवायचा? अशी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची धारण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT