Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama
विश्लेषण

Bhagat Singh Koshyari : कोश्यारी भाजपलाही नकोसे झालेत : राज्यपालांना हटविण्यामागे ‘हा’ आहे डाव

दत्ता देशमुख

बीड : छत्रपती शिवरायांसह राष्ट्रपुरुषांबद्दलच्या वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अनेकदा टीकेचे धनी झाले आहेत. औरंगाबादेतील वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात रान पेटले आहे. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या वक्तव्यामुळेही गदारोळ माजला. पण, स्पष्टीकरण देताना भाजपने (BJP) केवळ राज्यपालांना केंद्रस्थानी ठेवत त्रिवेदी व लोढांबद्दल शब्दही उच्चारला नाही. त्याचे कारणही तसेच असून आता राज्यपाल कोश्यारी भाजपलाही नकोसे झाले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Governor Bhagat Singh Koshyari has also become unwelcome to BJP)

भाजपसाठी मागच्या काळात अनेकदा नियमांवर बोट ठेवून राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणले. सरकार गेले पण विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नेमणुका झाल्याच नाहीत. आता याच भगतसिंह कोश्यारींकडून सरकारला त्यांच्या समर्थकांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नेमणूक केली, तर या गदारोळात पुन्हा पक्षपातीपणा ठळक दिसेल व त्याचा फटका सरकारला बसेल याची चाणाक्ष सरकारला जाण आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीनंतर व राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी कोश्यारींना नारळ मिळू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कायम पक्षपातीपणाचे आरोप झाले. त्या काळातही कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले. रातोरात राष्ट्रपती राजवट हटवून पहाटेचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधान परिषदेवर निवड अशा अनेक मुद्द्यांत राज्यपालांनी कायद्यावर बोट ठेवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल भाजपचे राज्यपाल असे आरोप व टीका झाली. त्यांना हटविण्याची कायम मागणी होत राहिली.

अलीकडे त्यांनी पुन्हा औरंगाबादेत छत्रपती शिवराय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ते टीकेचे धनी झाले. याच काळात भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी व नुकतेच मंत्री झालेले मंगलप्रसाद लोढा यांनीही छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून टीका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींसह शिवप्रेमी व समाज आक्रमक झाला आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपने केवळ राज्यपाल अधोरेखित केले आहेत. मंत्री लोढा व त्रिवेदींना मात्र पिंजऱ्याच्या बाहेर ठेवले आहे. याचा अर्थ सरळ आहे की कोश्यारींना हटवून वातावरण निवळायचे व समाजभावना आपल्या बाजूला घेण्याचे नियोजन आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत.

भाजपची खेळी

ज्या कोश्यारींनी आघाडी काळात राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुका केल्या नाहीत, त्यांच्याच हाताने आपल्या समर्थकांच्या नेमणुका करण्याने नव्याने टीका व आरोप सरकारला नको आहेत. आगामी अधिवेशनात सरकारला वरिष्ठ सभागृहात आपले संख्याबळ वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कोश्यारींना असाही नारळ द्यायचा आणि आम्ही समाज भावनेची कदर करतो. उदयनराजे व संभाजीराजेंच्या मतांचा आदर करतो, हे दाखवून द्यायचे आणि लोढा व त्रिवेदींचा विषय बाजूला ठेवायचा, अशी यामागे खेळी असू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT