Rahul Gandhi on Gujarat Election Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi on Gujarat : गुजरातमध्ये विजयाची राहुल गांधींची गर्जना कशाच्या जोरावर? जरा इकडंही लक्ष द्या...

Rajanand More

New Delhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये विजयाची गर्जना केली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर राहुल यांनी आव्हान दिले. पण राहुल यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून आला, याबाबत आता चर्चा झडू लागल्या आहेत.

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत मागील दहा वर्षांत यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचा एक खासदार निवडून आला. त्यानंतर पक्षाला राज्यात आशेचा किरण दिसू लागल्याचे बोलले जात आहे. अजून विधानसभा निवडणुकीला जवळपास तीन वर्षांचा कालावधी असला तरी सध्याची पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा मिळवत चांगली कामगिरी केली असली तरी गुजरातमधील विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी तितकी सोपी नसेल. सध्या गुजरात विधानसभेत 182 पैकी काँग्रेसचे केवळ 13 आमदार आहेत. 2022 च्या निवडणुकीनंतर चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. उरलेल्या आमदारांपैकी पुढील निवडणुकीपर्यंत कितीजण पक्षात राहणार, हे कुणीच सांगू शकत नाही.

गुजरातमधील 200 हून अधिक नेत्यांनी मागील वीस वर्षात पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व करणारा एकही चेहरा राज्यात नाही. पक्षात कुणी नेता आहे की नाही, असा प्रश्न पडेल इतकी दयनीय स्थिती आहे. राज्यात 1995 नंतर काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवता आलेली नाही.

गुजरातमध्ये 13 आमदारांसह एक राज्यसभा आणि एक लोकसभा खासदार आहे. या जोरावर राहुल यांनी लोकसभेत विजयाची गर्जना केली असेल तर ते दिवास्वप्न ठरेल. कारण लोकसभेत पक्षाला मिळालेली मते जेमतेम 30 टक्क्यांच्या जवळपास आहेत. तर दुसरीकडे भाजपने 60 टक्क्यांहून अधिक मते मिळवली आहेत.

भाजपचे राज्यात मजबूत संघटन आहे. प्रामुख्याने शहरी भागात मोदींचा दबदबा कायम आहे. आता केंद्रातही ते सत्तेत असल्याने गुजरातमधील त्यांची लोकप्रियता कमी होण्याची सध्यातरी काहीच शक्यता नाही. अशा स्थितीत राहुल यांना आपली गर्जना सत्यात उतरवायची असल्याची खूप घाम गाळावा लागणार आहे.

कोणतीही निवडणूक पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर लढवल्या जातात. पण काँग्रेसचे संघटन भाजपसमोर फिके पडते. राहुल यांना इथूनच सुरूवात करावी लागणार आहे. त्यांनी केलेली गर्जना याचीही सुरूवात असू शकते, अशी चर्चा आहे. कार्यकर्त्यांना ‘बब्बर शेर’सारखी ऊर्जा निर्माण करण्यासाठी राजकारणात असे बोलावे लागते. त्यांना असलेली विजयाची खात्री त्याचीच सुरूवात असेल तर त्यात खंड पडता कामा नये.

विजय मिळवायचा असेल तर राहुल यांच्यासह राज्यातील सर्वच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आकाश पाताळ एक करावे लागणार आहे. हे तितकेसे सोपे नसले तरी राजकारणात काहीही होऊ शकते, हेही विसरता कामा नये. पण कोणत्याही चमत्कारावर विसंबून न राहता राहुल यांनाच मैदानात उतरवून आपली गर्जना खरी करून दाखवण्यासाठी मोदी-शाह यांच्याशी दोन हात करावे लागणार आहे. त्याशिवाय विजय हाती लागणार नाही, हे निश्चित.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT