Congress alliance trouble : तमिळनाडूतील सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर करताच इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. द्रमुकसोबत विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने मागेपुढे न पाहता थेट विजय यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यसभा आणि लोकसभा निवडणूकही या पक्षासोबतच लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. त्यामुळे द्रमुक नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. एवढेच नाही तर देशातही याचे पडसाद उमटू लागले आहे.
इंडिया आघाडीमध्ये द्रमुक चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचे लोकसभेत २२ खासदार आहे. पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून काँग्रेससोबतची आपली आघाडी तुटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. द्रमकच्या या भूमिकेआधी इंडिया आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या समाजदावी पक्षानेही काँग्रेसवर बॉम्ब टाकला आहे.
समाजवादी पक्षाचे लोकसभेत ३३ खासदार आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. अखिलेश यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतचे दोन स्वतंत्र फोटो पोस्ट केले आहेत. अडचणीमध्ये साथ सोडणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे अखिलेश यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अखिलेश यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी बंगालमध्ये जाऊन नुकतीच ममतादीदींची भेट घेतली. त्यानंतर ही पोस्ट करत त्यांनी आपण स्टॅलिन यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका द्रमुकने केली आहे. अखिलेश यांनी एकप्रकारे द्रमुकच्या भूमिकेला पाठिंबा देत काँग्रेसला इशारा दिला आहे.
अखिलेश आणि स्टॅलिन यांचे एकूण ५९ खासदार आहे. तर ममतादीदींच्या पक्षाचेही २८ खासदार लोकसभेत आहेत. इंडिया आघाडीतील दोन बड्या पक्षांनी उघडपणे काँग्रेसशी नाते तोडण्याचे संकेत दिल्यानंतर आधीच काँग्रेसशी फारसे न पटणाऱ्या ममतादीदीही अखिलेश आणि स्टॅलिन यांच्या सुरात सूर मिसळू शकतात. अद्याप तमिळनाडूतील घडामोडींवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सध्याच्या घडामोडी पाहता तमिळनाडूतील भूमिका काँग्रेसला दिल्लीत महागात पडण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण विधेयकावरून लोकसभेत काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीची मजबूत एकी दिसून आली होती. त्यानंतर काही दिवसांत आघाडीत त्सुनामी आल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर आज अखिलेश यांनी घेतलेल्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमधील आघाडीवरही परिणाम होऊ शकते. असे झाल्यास उत्तर प्रदेशातील राजकीय चित्र बदलू शकते. तमिळनाडूतील मुद्दा अखिलेश किती ताणून धरणार, यावरच आता इंडिया आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.