PM Modi's Firm Stance No Tolerance for Nuclear Blackmail : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासियांना संबोधित करताना पाकिस्तानसह जगालाही सूचक संदेश दिला आहे. एका अर्थाने भारत आता कुणाच्याही आणि कोणत्याही धमक्यांसमोर झुकणार नाही, हे मोदींनी ठणकावून सांगितले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराने पाकचे कंबरडे मोडून टाकले. एवढेच नाही सिंधू जलकरार स्थगित करत तोंडचे पाणी पळवले. पण भारत आता इथेच थांबणार नाही, तिकडून गोळ्या आल्या तर इकडून गोळे जातील, असा स्पष्ट इशारा मोदींनी दिला आहे. पण मोदींनी देशवासियांना संबोधित करण्यासाठी बुध्द पौर्णिमेचा दिवस निवडण्यामागची रणनीती समजून घेणे महत्वाचे आहे.
पंतप्रधान मोदींनी कालच्या संबोधनात एक नवी युध्दनीती सेट केल्याचे स्पष्ट दिसते. दहशतवादावरील प्रहार आता न्यू नॉर्मल आहे, न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, पाकशी चर्चा आता केवळ दहशतवाद आणि पीओकेवर होईल... मोदींच्या या तीन वाक्यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वर पंतप्रधानांनी सोमवारी रात्री आठवाजेपर्यंत एक शब्दही उच्चारला नव्हता. त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा त्याचा उल्लेखही करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी बुध्द पौर्णिमेचा दिवस निवडला.
भारताने पाकमधील दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर तेथील नेत्यांकडून अणुबॉम्बच्या सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. पाणी अडवले तर रक्ताचे पाट वाहतील, अशा वल्गना केल्या जात होत्या. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुध्दांना साक्षी ठेवत पंतप्रधान मोदींनी या धमक्यांना भारत भीक घालत नाही, हे स्पष्ट केले.
बुध्द पौर्णिमेच्याच दिवशी 1974 मध्ये भारताने इतिहास घडवला होता. अमेरिकासारख्या बलाढ्य देशासह संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 18 मे रोजी पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली होती. या अणुचाचणीला ‘स्मायलिंग बुध्दा’ असे नाव देण्यात आले होते. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक राजा रामण्णा यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना फोन करून ‘बुध्द हसले आहेत’, असे सांगितले होते. ऑपरेशन स्मायलिंग बुध्दा हे भारतासाठी मैलाचा दगड ठरले. कारण या अणुचाचणीने भारताची ताकद जगाला दिसून आली.
युध्द नको बुध्द हवा... म्हणजे जगात शांतता नांदावी, यासाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतला. पण भारताकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार असेल तर तसेच प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेशही या ऑपरेशनने जगाला दिला. पंतप्रधान मोदींनीही पाकच्या आण्विक धमक्यांचा उल्लेख करत एकप्रकारे सूचक इशारा दिला. भारतीय लष्कराच्या शौर्याचे श्रेय लुटणाऱ्या अमेरिकेसाठीही इशारा आहे. पाकिस्तानातील दहशतवाद आणि पाकिस्तान सरकारला आपण वेगळे पाहणार नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी एक घाव दोन तुकडे केले आहेत.
आण्विक ताकदीच्या आडून दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी आम्हीही त्याहून अधिक ताकदीचे आहोत, हे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. भारताला आणि संपूर्ण जगाला शांती हवी आहे. गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला. पण भारताने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला स्मायलिंग बुध्दा हे नाव देत भारताने जगाला सूचक इशाराही दिला होता. पंतप्रधान मोदींनी बुध्द पौर्णिमेचा दिवस निवडताना शांतीसाठी शक्तीचा वापर होऊ शकतो, असे सांगत भारत आता नव्या युध्दनीतीने चालणार असल्याचे सुस्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.