Narendra Modi | Dr. Manmohan Singh Sarkarnama
विश्लेषण

India Vs Pakistan : डॉ. मनमोहनसिंहांनी 18 वर्षांपूर्वी टाळलेली गोष्ट अखेर नरेंद्र मोदींनी केलीच!

Narendra Modi | Dr. Manmohan Singh : पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कुरापतखोरीचा भारत आता कायमचा हिशोब करण्याच्या मूडमध्ये आहे. 1971 च्या बांगलादेश युद्धात झाला होता तसा.

Hrishikesh Nalagune

पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कुरापतखोरीचा भारत आता कायमचा हिशोब करण्याच्या मूडमध्ये आहे. 1971 च्या बांगलादेश युद्धात झाला होता तसा. पहलगामच्या दुर्दैवी घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने सुरुवातीच्या टप्प्यात सिंधू करार स्थगित केला. मुस्लीम पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. आयात-निर्यात थांबवली, व्यापार बंद केला.

एक मोठा दणका देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. त्यानंतर भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती सुरु झाल्या आहेत. 15 शहरांवर ड्रोन हल्ले केल्यानंतर सीमेवर गोळीबार, धार्मिक स्थळांवर हल्ले सुरू आहेत. या सगळ्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतानेही लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली. कराची बंदराचा कोळसा केला.

पण आता पाकिस्तानच्या मर्मस्थळीच घाव घालावा लागेल, हे ओळखून सरकारने त्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत -पाकिस्तान देशात युद्ध परिस्थिती तयार झाली आहे. मात्र यामुळे 18 वर्षांपूर्वी जी गोष्ट डॉ. मनमोहनसिंग यांनी टाळली होती तीच गोष्ट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

17 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये सप्टेंबर महिन्यात 'लेहमन ब्रदर्स'च्या दिवाळखोरीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था खिळखिळ्या होत होत्या. त्याचवेळी 26/11 च्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याने भारताची आर्थिक राजधानी मुंबई हादरली होती. आधीच मंदी त्यात भारताला युद्धासाठी प्रवृत्त करणारा दहशतवादी हल्ला अशी 2008 ची स्थिती होती.

त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने युद्धाचे आव्हान स्वीकारण्याचे टाळून पाकिस्तानला कूटनीतीने जगापुढे लज्जित करण्यावर भर दिला. कारण त्यावेळी जगाला आणि भारताला मंदीचा विळखा पडला होता. त्यात युद्धाची भर पडणे म्हणजे 'दुष्काळात तेरावा' ठरला असता. त्यामुळे 2009 च्या आर्थिक मंदीमध्ये अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला तरी भारताला त्याची झळ बसली नाही.

आता यंदाही त्याचीच पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणामुळे जगावर मंदीचे सावट पसरणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याने भारताच्या आत्म्यावर पुन्हा आघात केला आहे. यावेळी मात्र भारताने कूटनीती सोबतच सैन्य ताकदीचा वापर करण्यावर भर दिला आहे.

9 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते, तर 6 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर हल्ले केले होते. यावेळी वेगळे काही तरी घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण युद्ध झालेच तर त्यानंतर होणारे परिणाम गंभीर असू शकतील, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

आज घडीला भारत-पाक युद्ध झालेच तर ते कारगील युद्धाप्रमाणे झटपट संपेल की दीर्घकाळ चालेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यावर होणारा खर्च मोजदाद करण्याच्या पलिकडे असणार आहे. शिवाय मंदी अजून आलेली नाही. तिला येऊ द्यायचे की नाही, हे ट्रम्प यांना ठरवायचे आहे. ट्रम्प यांनी त्यांचे आक्रमक धोरण कायम ठेवले तर त्याची झळ भारताला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यातच युद्ध म्हणजे मंदीचे सावट आणखी गडद होऊ शकते.

त्यामुळेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी युद्ध टाळण्यावर भर दिला होता. यावेळीही युद्ध टाळण्याच सल्ला अनेक देश देत आहेत. पण युद्ध झालेच तर पाकिस्तान, तिथले लष्कर आणि आयएसआय समर्थित दहशतवाद्यांचा कायमचा बीमोड करणे हे भारतापुढचे मुख्य लक्ष्य असणार आहे. हे युद्ध जिंकून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेत युद्धावर झालेला खर्च सार्थकी लावण्याचे आव्हान भारतापुढे असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT