Sadashivrao patil Sarkarnama
विश्लेषण

Sadashivrao patil : सदाशिवराव पाटील सध्या इतके शांत का? मतदारसंघात चुप्पी...

सरकारनामा ब्यूरो

विद्याधर कुलकर्णी, विटा

Satara News : खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील हे सध्या राजकीय अज्ञातवासात गेले आहेत का, असा प्रश्न पडला आहे. शांत, संयमी आणि अभ्यासूपणे काम करण्याची हातोटी असणारे नेते, अशी त्यांची सांगली जिल्ह्यात ख्याती आहे. आमदार म्हणून मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून सत्तेचा वापर करून कामे कशी करतात, याची प्रचीती त्यांनी दिली आहे. परंतु, आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये सहभागी होऊन आपले मत किंवा विचार मांडताना ते दिसत नाहीत.

राज्यातील फुटाफुटीच्या राजकारणाच्या आधी सदाशिवराव पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपण शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि त्यांचा झंझावात दिसण्यास सुरुवात झाली होती. पण आता मात्र ते कोणत्याही भूमिकेत नसल्याचे पाहायला मिळते. मतदारसंघातील कोणत्याही प्रश्नावर अथवा समस्येवर त्यांची चुप्पी आहे. त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील मात्र अजित पवार गटातून या मतदारसंघामध्ये लक्ष घालत आहेत आणि तो प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सदाशिवराव पाटील नक्की काय भूमिका घेणार, याची उत्सुकता त्यांना मानणारे सर्व कार्यकर्ते, नागरिक आणि मतदारांना लागलेली आहे. दुसरीकडे वैभव पाटील मात्र मीच निवडणुकीसाठी तयार असल्याचे दाखवण्यात मग्न आहेत. सदाशिवराव पाटील कोणत्याही भूमिकेत नसल्याने खानापूर-आटपाडी व विसापूर सर्कलमधील मतदारांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. ते मुलाला पुढे आणण्यासाठी शांत आहेत की शरद पवार मतदारसंघासाठी काय भूमिका घेतात, याची वाट पाहत आहेत, हे येत्या काळातच कळेल.

सदाशिवराव पाटील यांनी विटा नगरपालिकेमध्ये दीर्घ काळ नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. विटा शहराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना त्यांनी त्यावर मात करीत जवळपास ३५ किलोमीटर दूर असणाऱ्या घोगाव येथून कृष्णा नदीचे पाणी बारमाही विटा शहर व परिसरात उपलब्ध करून दिले. २००४ मध्ये या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडूनही आले. त्यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार होते, असे असूनही त्यांनी या भागामध्ये मोठा निधी आणून या भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. दूरदृष्टी असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा एमआयडीसीचा प्रश्नही मार्गी लावला. २००४ आणि २००९ असे सलग दोनवेळा या मतदारसंघात आमदार म्हणून विजयी होण्याचा बहुमान प्राप्त करणारे सदाशिवराव पाटील एकमेव नेते आहेत. यापूर्वी कोणालाही ही किमया करता आली नव्हती. पण सध्या ते इतके शांत का आहेत, हा प्रश्न राहून राहून मतदारांमध्ये उपस्थित होतो आहे.

Edited by: Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT