Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Kolhapur Politics Analysis : विधानसभेला मैत्रिपूर्ण लढत भाजपला घातक; कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : राज्यातील राजकीय समीकरणे बदललेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मैत्रिपूर्ण लढत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात गतवेळी झालेल्या मैत्रिपूर्ण लढतीत भाजपसह शिवसेनेलाही फटका बसला होता. यंदा विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती वेगळी असली तरी मैत्रिपूर्ण लढती महायुतीतील भाजपला महागात पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, कागल, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वादाचे सावट घोंघावत आहे. मागील निवडणुकीत कार्यकर्ते जपण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी मैत्रिपूर्ण लढतीस हिरवा कंदील दाखवला होता. आताही काही मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत असले तरी तीच लढत आता भाजप आणि शिंदे सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही महाविकास आघाडी, महायुतीला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे महायुतीत बंडखोरांचेही मोठे आव्हान वरिष्ठ नेत्यांपुढे असणार आहे. यातूनच कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी अनेक विधानसभा मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय पुढे येत आहे.

विधानसभा 2019 च्या निवडणुकीत कोल्हापुरातील Kolhapur कागल, चंदगड, शिरोळ, इचलकरंजी आणि राधानगरीत मैत्रिपूर्ण लढती झाल्या. त्यातील केवळ राधानगरीत युतीला यश मिळाले. त्यामुळे भाजपसह शिवसेनेला हक्काच्या जागा गमवाव्या लागल्याचे शैल्य नेत्यांना आहे. यंदाही त्याच परिस्थितीतून मार्ग काढण्याची तयारी सुरू असली तरी आघाडीच्या एकजुटीमुळे युतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला अधिक धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

चंदगड

चंदगडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते अशोक चराटी हे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात रिंगणात होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली. तर शिवसेनेकडून संग्राम सिंह कुपेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. युतीमध्येच मताची विभागणी झाल्यानंतर राजेश पाटील हे अवघ्या साडेचार हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील, शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे महायुतीतील नेते चंदगडमधून प्रबळ दावेदार मानले जातात.

कागल

कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांच्याविरोधात भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी अपक्ष शड्डू ठोकला. मात्र शिवसेनेने संजय घाटगे यांच्या रूपाने दिल्याने युतीला या ठिकाणी फटका बसला. शिवसेनेच्या संजय घाटगे यांना जवळपास 55 हजार 657 इतकी मते पडली. तर 88 हजार 303 घेत घाटगेंचा 28 हजार 133 मतांनी पराभव झाला. यंदाही मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे कागल युतीत आणखी डोकेदुखी वाढणार आहे. यातून मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय बाहेर येण्याची शक्यता आहे.

शिरोळ

शिरोळ मतदारसंघात अपक्ष म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपचे कार्यकर्ते असणारे अनिल यादव यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उमेदवारीने विभागणी होऊन राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी झाले. विजयानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेच्या हक्काची असणारी जागा कमी झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातील. त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा असू शकतो. पण भाजपकडून राजवर्धन नाईक निंबाळकर, आणि माधवराव घाटगे यांचेही नाव आघाडीवर आहे.

इचलकरंजी

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीला अपक्ष म्हणून आमदार आवाडे यांनी जवळपास 49 हजार मतांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा पराभव केला. विजयी होताच आवाडेंनी भाजपला पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत हळवणकर हे देखील इच्छुक आहेत. आवडे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. दोघेही ठाम राहिले तर मैत्रीपूर्ण लढत करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

राधानगरी

राधानगरीत 2019 मध्ये युतीला यश मिळाले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांचा पराभव केला. मात्र उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. तरी देखील आबिटकरांनी विजयी खेचून आणला. सध्याची परिस्थिती पाहता विकास आघाडीत एकजूट आहे. गतवेळेप्रमाणे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मैत्रिपूर्ण लढत केल्यास जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल अशी शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT