girish mahajan jalgaon lok sabha sarkarnama
विश्लेषण

Jalgaon Lok Sabha Constituency : निवडणूक लोकसभेची, परीक्षा मात्र गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठेची?

Sampat Devgire

Jalgaon Girish Mahajan News, 19 May : जळगाव लोकसभा मतदारसंघात ( Jalgaon Lok Sabha Constituency ) विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना भाजपने ( bjp ) यंदा उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राजकीय मोर्चे बांधणी करण्यात आली आहे. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ ( Smita Wagh ) आणि शिवसेनेचे ( ठाकरे गट ) उमेदवार करण पवार ( Karan Pawar ) यांच्यात मुकाबला आहे. वरकरणी या उमेदवारांमध्ये लढत आहे. मात्र, प्रत्यक्षात भाजपचे मंत्री महाजन आणि शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्यांमध्येच खरी लढत होत आहे.

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जळगाव मतदारसंघात यंदाही ऐनवेळी उमेदवार बदलण्याची परंपरा कायम ठेवली. विद्यमान खासदार उन्मेष पाटील ( Unmesh Patil ) यांचे प्रगती पुस्तक चांगले होते. मतदारसंघात त्यांच्याविषयी पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी देखील नव्हती. मतदारसंघात त्यांनी विविध विकासकामे केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळणारच, असा पाटलांना आत्मविश्वास होता. मात्र, ऐनवेळी त्यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांचा मोठा वाटा होता.

उमेदवारी रद्द झाल्याने त्यामागे ग्रामविकास मंत्री महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण ( Mangesh Chavan ) यांचे राजकीय षडयंत्र असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उमेदवारी नाकारलेले उन्मेष पाटील चांगलेच नाराज झाले. त्यांच्याविरोधात झालेल्या राजकीय खेळीला सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांनीही एक मोठा डाव टाकला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सोबत पारोळा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष करण पवार यांचाही प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी मिळवून दिली. करण पवार यांच्या मागे उन्मेश पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजपला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे जळगाव मतदारसंघ राखणे भाजपला मोठे आव्हान ठरले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असले, तरी खरी लढत झाली ती गिरीश महाजन आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यात. निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अतिशय आक्रमक होत आरोप केले. परिणामी हे सुडाचे राजकारण लोकसभा निवडणूक निकालानंतर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय प्रतिष्ठेला भविष्यात आव्हान दिले जाण्याचे संकेत आहेत. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या आजी-माजी नेत्यांमध्ये मोठे राजकीय डावपेच खेळले जाणार आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT