Jayant Sinha, Goutam Gambhir  Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 News : अवघ्या काही तासांत भाजपच्या दोन खासदारांचा राजकारणातून संन्यास ! नेमकं काय आहे कारण?

Sachin Waghmare

Bjp News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा असतानाच अवघ्या 24 तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केला. पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा या दोन भाजप खासदारांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे.

गंभीरने पुन्हा क्रिकेटशी निगडित बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे, तर जयंत सिन्हा यांनी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करण्यासाठी राजकारण सोडत असल्याचे म्हटले आहे. दोघांनी ट्विट करून शनिवारी राजीनामा दिला.

पूर्व दिल्लीचे खासदार व भाजप नेते गौतम गंभीरने अचानक राजकीय संन्यास का घेतला ? असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच गंभीरने अचानक ट्विट करीत राजकारणाच्या पीचवरून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या राजकारणाच्या पीचवर माघार का घेतली ? असावी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाच वर्षांपूर्वी क्रिकेटचे मैदान सर्वाअर्थाने गाजवल्यानंतर गंभीरने राजकारणाच्या पीचवर दमदार एन्ट्री केली होती. तसे पहिले तर क्रिकेटपेक्षा मैदानावर त्यांनी केलेले वादच अनेक जणांना लक्षात येतात. गौतम गंभीर हा शाब्दिक युद्धांसाठीही प्रसिद्ध आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन यांच्याबरोबरचा गंभीरचा वाद चर्चेत आहे.

गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे आतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. त्यामुळे या मतदारसंघात जम बसविण्याची संधी होती मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले.

या निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर त्यांनी मतदारांशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. त्यामुळे भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही जागा डेंजर झोनमध्ये दिसत होती. त्यामुळे भाजपकडून या ठिकाणी गौतम गंभीरऐवजी अन्य उमेदवाराचा पर्याय शोधला जात असल्याची जोरदार चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी, त्यामागे त्याला भाजपकडून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, हेसुद्धा एक कारण असल्याचे समजते. आगामी निवडणुकीत भाजप (Bjp) 70 ते 80 खासदारांचे तिकीट भाजपकडून कापण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.

कमकुवत कामगिरी हे त्यामागचे कारण आहे. तिकीट नाकारण्यापेक्षा सन्माने एक्झिटचा पर्याय गंभीरने निवडला असावा, असे म्हटले जाते. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून अभिनेता अक्षयकुमार, हर्ष मल्होत्रा, कुलवंत सिंह चहल यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एकाला या ठिकाणाहून उमेदवारी दिली जाणार आहे.

गौतम गंभीर यांनी ट्विट केल्यानंतर काही वेळातच हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. येत्या काळात भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

तिकीट कापल्यानंतरही नाराजी उफाळण्याची चिन्हे

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सुमारे 16 राज्यांच्या नावांवर चर्चा केली आहे. पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये तिकीट कापल्यानंतरही नाराजी उफाळण्याची चिन्हे आहेत.

R

SCROLL FOR NEXT