BJP leader Vinod Tawde  Sarkarnama
विश्लेषण

Vinod Tawde : धक्कातंत्र, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची विनोद तावडेंना पसंती ?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब :

Mumbai News: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये धक्कातंत्राचा वापर करत भाजपने प्रस्थापितांना दूर केले आणि नवीन अनपेक्षित चेहऱ्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. आता असाच प्रयोग आगामी निवडणुकांमध्ये पक्ष राबवणार असल्याचे दिसत असून, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास विनोद तावडेंना मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे गंमतीने का होईना स्वतः तावडेंनी याला दुजोरा दिला आहे. सध्या भाजपच्या केंद्रीय राजकारणात सक्रिय असलेले तावडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या तावडे यांनी प्रथमच राज्याच्या राजकारणात एन्ट्री घेताना भविष्याची दिशा दाखवली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवल्यानंतर आता भाजपला लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असून, त्याच्या तयारीवर आता शेवटचा हात फिरवण्यासाठी केंद्रीय राजकारणातील त्यांचे नेते देशभराच्या दौऱ्यावर निघाले आहेत. लोकसभेसाठी भाजपने 400 जागांचे लक्ष्य ठेवले असून महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा त्यांना जिंकायच्या आहेत. उत्तरेच्या भागात भाजप आघाडीवर असली तरी दक्षिणेत आणि पूर्व भारतात भाजप अजून मागे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर त्यांची भिस्त असून, आपली सर्व ताकद लावण्यासाठी त्यांनी हुकमी पत्ते राज्यात उतरवण्यास सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणजे तावडे यांची राज्याच्या राजकारणात झालेली एन्ट्री होय. भाजपात राष्ट्रीय सरचिटणीसपदाला खूप महत्वाचे स्थान असून, या पदावरील व्यक्तीवर आपली मेहरनजर व्हावी, यासाठी राज्यातील नेते आटापीटा करत असतात. सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तावडे यांनी आपल्या पक्षाच्या ताकदीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत काही राज्याचे आणि आपले स्वतःचेसुद्धा पत्ते फेकत भविष्याचा अंदाज घेतला.

लोकांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून जाहीर घोषणा करणाऱ्या पंकजा मुंडे यांची अवस्था राज्याच्या राजकारणात असून नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे फक्त पंकजा नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खडसे, तावडे, बावनकुळे या सर्व मराठा, ओबीसी नेत्यांना आपल्या वाटेवरून दूर करत दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी स्वतःची प्रतिमा तयार करत राज्यात भाजपवर स्वतःची एकहाती पकड ठेवली आहे आणि हे करताना स्वतःची नवीन टीम तयार केली आहे.

यात पक्षातल्यापेक्षा बाहेरून आलेल्या नारायण राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना आपले सुरक्षा कवच बनवले आहे. यामुळे पक्षातील अनुभवी नेते आणि संघटक नाराज असले तरी फडणवीस यांना पक्ष नेतृत्वाने रोखले नव्हते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आता फडणवीस यांच्याकडे बघण्याचा दिल्लीचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे, हे दिसून येत आहे. तावडे यांची एन्ट्री सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत. पण, त्याची स्थिती आज पक्ष सोडून जाता येत नाही आणि राहता सुद्धा येत नाही, अशी झालीय. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे त्या आता आपल्या समर्थकांकडून इच्छा व्यक्त करून दाखवत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपले 145 आमदार निवडून आले तर मी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मुख्यमंत्री करेल, असं वक्तव्य केले होते.

यावर तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का ? तुम्हाला पंकजा मुंडेंची खूप काळजी वाटते". त्यांच्या या वक्तव्यानंतर तावडेंच्या मनात मुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा असल्याचे लपून राहिलेली नाही, असेच दिसते. 2014 मध्ये शिवसेनेसोबत सत्तेत आल्यानंतर राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्यापेक्षा सीनियर असून त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती.

त्यानंतर पाच वर्षांत फडणवीस यांनी त्यांचे महत्व कमी कमी करत 2019 मध्ये आमदारकीचे तिकीट सुद्धा मिळणार नाही, असा राजकीय डाव करत त्यांना लांब केले. काही काळ विजनवासात गेलेल्या तावडे यांना दिल्लीने राष्ट्रीय राजकारणात आणत पुन्हा एकदा त्यांचे महत्व वाढवत फडणवीस यांना चेकमेट दिला. यामागे भाजपचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे असल्याचे बोलले जाते.

देशात फडणवीस यांची प्रतिमा मोठी होत असल्याने भविष्यातील ते पंतप्रधान असल्याचे पक्षात आणि पक्षाबाहेर सुद्धा बोलले जाते. तशी एक यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा आशीर्वाद असल्याचा या चर्चेतील एक भाग आहे. मोदी यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून आपल्या नावाच्या मागेपुढे कोणी असता कामा नये, यासाठी शाह डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत. फडणवीस यांच्या नावाची चर्चा त्यांच्या कानावर आल्यापासूनच ते फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, याची काळजी घेताना दिसत आहेत, असे बोलले जाते.

बाहेरून आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार यांच्याकडे तिजोरीची अर्थमंत्रीपदाची चावी देत दिल्लीने फडणवीस यांना एकप्रकारे चेकमेट दिला आहे. हुशार, अभ्यासू आणि अथक काम करण्याची ताकद असणारे फडणवीस सत्ताबदलामुळे मनातून नाराज आहेत. पण संघाच्या छायेत वाढलेल्या नागपूरकरांना प्रतिकूल परिस्थितीत टिकाव कसा धरायचा याचे बाळकडू मिळालेले असल्याने ते चिवट मुकाबला करत आहेत.

आता त्यांची कसोटी आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लागणार आहे. भाजपला अपेक्षित 45 जागा मिळाल्या नाही तर विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरचे मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कठीण होऊन बसेल. अशावेळी पक्ष विनोद तावडे यांना पुढे आणून सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती देऊ शकतात. यामागे मराठा कार्ड खेळण्याची भाजपची चाल असू शकते.

(लेखक मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT