Raj Thackeray, Uddhav Thackeray  SARKARNAMA
विश्लेषण

Maharashtra Politics : 'धारावी'वरून 'शिवतीर्थ' विरुद्ध 'मातोश्री'मध्ये नवा 'सामना'

अय्यूब कादरी

Mumbai News : गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवून विरोधकांना प्रश्न विचारण्याची, त्यांच्यावर टीका करण्याची पद्धत रूढ झाली आहे. सत्ताधारी पक्ष आपले अपयश लपवण्यासाठी स्वतःही अशी टीका करतात आणि अन्य पक्षांचाही त्यासाठी वापर करत आहेत. सत्ताधारी पक्ष जेव्हा सातत्याने विरोधकांना प्रश्न विचारतात त्यावेळी सर्वकाही आलबेल नाही, असे समजून घेतले पाहिजे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर सत्ताधारी पक्षापाठोपाठ आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टीका केली आहे.

अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी नुकतीच एसआय़टी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर आदित्य यांच्या काकू, म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य यांची बाजू घेतली होती. आदित्यने असे काही केले असेल असे वाटत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावरून ठाकरे बंधूंबाबत सकारात्मक चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. धारावीचा पुनर्विकास करण्याचे कंत्राट राज्य सरकारने अदानींच्या कंपनीला दिले आहे. यामध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला आहे, धारावीसह मुंबईतील तीन प्रकल्प अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी 16 डिसेंबर रोजी अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मोर्चाला धारावीकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न भाजप, एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. राज ठाकरे ही यात आघाडीवर असतात. ठाकरे गटातील नेत्यांना लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. असे असतानाही उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला झालेली मोठी गर्दी भाजप, शिंदे गट आणि मनसेलाही धडकी भरवणारी ठरली आहे. हे तिन्ही पक्ष मुंबईत आधार शोधत आहेत. भाजप-शिंदे गटाला काहीही करून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे. मात्र मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती कमी होताना दिसत नसल्याने त्यांच्यावर तिखट हल्ले केले जात आहेत. ते यापुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात रान पेटवणारे राज ठाकरे नंतर शांत झाला. ईडीची एक नोटीस आली की त्यांचा भाजप विरोध मावळला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ते मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांनी तोही मुद्दा गुंडाळून ठेवला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा या दांपत्यानेही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले होते. मुद्दा घेतला होता हनुमान चालिसा पठणाचा. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना समोर हनुमान चालिसा पठण करायचे होते. मुख्यमंत्री बदलले आणि राणा दांपत्यानेही तो मुद्दा गुंडाळून ठेवला.

उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे विकासाला विरोध आहे, अशी टीका भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली. भाजपने हा प्रघात पाडला आहे. भाजप करत असलेल्या एखाद्या गोष्टीला विरोध म्हणजे विकासाला विरोध, असे समीकरण रूढ करण्यात आले आहे. इतके सगळे करूनही मुंबई महापालिकेचा सत्ता आपल्याला मिळेल, याची शाश्वती भाजप आणि शिंदे गटाला राहिलेली नाही, असे त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवरून लक्षात येते. अदानी यांच्याशी सेटलमेंट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राजकीय पक्ष उद्योजकांशी, कंत्राटदारांशी सेटलमेंट करतात, असेच जणू राज ठाकरे यांना म्हणायचे असेल.

(Edited by- Sudesh Mitkar )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT