Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Sharad Pawar, Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra​ Politics: ‘सोशल इंजिनिअरिंग’ करण्यात आघाडी मागे; ठाकरे गटासमोर काँग्रेसचे नमते धोरण

सरकारनामा ब्यूरो

विजय चोरमारे

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अखेर मंगळवारी सुटला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अखेर उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केली.

सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांमधून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तिढा सुटत नसल्याचे जे चित्र निर्माण झाले होते, ते पुसून टाकण्याचा प्रयत्न आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुढे (uddhav thackeray) नमते घेऊन पुढे जाण्याचे धोरण काँग्रेसने (Congress) स्वीकारल्याचे महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर स्पष्ट झाले आहे.

जागावाटपाच्या सुंदोपसुंदीत निवडणुकीसाठी आवश्यक असणारे सोशल इंजिनिअरिंग करण्यातही आघाडी मागे राहिली. प्रकाश आंबेडकर दुरावल्यानंतर त्यादृष्टीने आघाडीकडून प्रयत्न झाले नाहीत. जून २०२२ मध्ये राज्यसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही भाजपने व्यूहरचना करून आघाडीला पराभूत केले होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आलेल्या सर्वेक्षणांत महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. जागावाटपात दाखवलेल्या ढिसाळपणामुळे ती परिस्थिती राहिली नसल्याचे दिसते.

दोन जागांवर शिवसेनेने थेट उमेदवारच जाहीर..

सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन जागांवर काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना यात संघर्ष होता.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्या. पण या दोन जागांवर शिवसेनेने थेट उमेदवारच जाहीर केले होते. त्यासंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी वारंवार चर्चा करून या जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. सांगलीच्या जागेसाठी माजी मंत्री विश्वजित कदम, संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही, परिणामी हव्या असलेल्या दोन्हीपैकी एकाही जागेबाबत शिवसेनेने लवचिकता दाखवली नाही.

काही प्रश्न तसेच राहिले...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची एरव्ही जागावाटपामध्ये महत्त्वाची भूमिका असते. कोणती जागा कुणाला आणि तेथील उमेदवार कोण असेल तर फायद्याचे ठरेल, याची गणिते पवारांच्या डोक्यात पक्की असतात. अखेरच्या टप्प्यात ते सगळ्या गोष्टी दुरुस्त करीत असतात. परंतु यावेळी शरद पवारांना महाविकास आघाडीसाठी पुरेसा वेळ देता आला नसल्याचे दिसून येते. त्यांचा बराचसा वेळ प्रचाराबरोबरच पक्षाचे उमेदवार ठरवण्यासंदर्भातील बैठकांमध्ये गेला. बहुतांश काळ ते मुंबईबाहेरच असल्यामुळे त्यांना बारीकसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालणे शक्य झाले नाही. त्यातूनही काही प्रश्न तसेच राहिले आणि तोडगा न निघताच ते एकतर्फी निकालात निघाले. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाला न दुखावण्याचे काँग्रेसचे धोरण

राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीतील अनेक पक्ष ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात लढत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस पक्ष तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरील हल्ले तीव्र केले जात आहेत. अशा परिस्थितीत भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेणा-या एका पक्षाला सोबत ठेवण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले. ‘वीर सावरकर’ चित्रपटावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करणा-या देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दौ-यात उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उत्तर दिल्याचे उदाहरण अगदी ताजे आहे. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला न दुखावण्याचे धोरण काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारले आहे, त्याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रातील जागा वाटपामध्ये सहन करावा लागल्याचे दिसते.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT