Congress Sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : काँग्रेसच्या 'हाता'चा अनेकांना साक्षात्कार

Maharashtra Congress : पूर्व विदर्भातील गोंदियाचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांच्यापासून सुरू झालेली दिग्गज नेत्यांची ‘इनकमिंग एक्स्प्रेस’ २० सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांच्यापर्यंत येऊन ठेपली आहे.

प्रमोद बोडके

Political News : सध्या राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीत आपले भवितव्य काँग्रेसमध्येच असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला आहे. ‘काँग्रेसचा हात’च आपल्याला खरा हात देईल, म्हणून त्यांना हा पक्ष भरवशाचा वाटू लागला आहे. पूर्व विदर्भातील गोंदियाचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांच्यापासून सुरू झालेली दिग्गज नेत्यांची ‘इनकमिंग एक्स्प्रेस’ २० सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांच्यापर्यंत येऊन ठेपली आहे. मराठवाड्यातून ही ‘एक्स्प्रेस’ पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई पट्ट्यात जाईल, असा अंदाज आहे.

विदर्भात काँग्रेसला पुन्हा उभारी!

लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मोठा धमाका असेल, असा विश्‍वास काँग्रेसजन बाळगू लागले आहेत. त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पायाभरणी सुरू केली आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे उदय मेघे यांच्या काँग्रेस प्रवेशाने नागपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.

भंडारा, गोंदियाचे राजकारण नेहमीच पटेल (प्रफुल्ल), पटोले (नाना) व पटले (शिशुपाल) यांच्या भोवती फिरत राहिले आहे. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतल्याने या जिल्ह्यात आता ‘पटेल विरुद्ध पटोले-पटले’ असा सामना रंगणार आहे.

काँग्रेसमध्ये (Congress) २७ वर्षे विधानसभा व विधान परिषद सदस्य म्हणून काम करणाऱ्या गोपालदास अग्रवाल यांनी २०१९ मध्ये भाजपचा झेंडा हाती घेतला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अग्रवाल यांची ओळख होती. अग्रवाल यांना भाजपने २०१९ मध्ये गोंदियातून उमेदवारी दिली होती, पण ते अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून तब्बल २७ हजार मतांनी पराभूत झाले.

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि भाजप यांची गट्टी चांगलीच जमल्याने गोपालदास अग्रवाल यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही अग्रवाल पुन्हा एकमेकांच्या समोर निवडणूक आखाड्यात येण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भानंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपचा झेंडा उतरवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी चव्हाण यांच्यापाठोपाठ त्यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सूनबाई मीनल खतगावकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघामधून २०२४ च्या निवडणुकीत मीनल खतगावकर यांना भाजपची उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती.

खतगावकर काँग्रेसमध्ये

भाजपने या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली. काँग्रेसने वसंतराव चव्हाण या ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी दिली. नांदेडच्या जनतेने भाजपच्या चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला, येथून विजयी झालेले काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले आहे. कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेचीही पोटनिवडणूक होऊ शकते, त्यामुळे खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाला अधिक महत्त्व आले आहे.

मीनल खतगावकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. नंतरच्या काळात त्यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती. जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने कदाचित त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असावा. काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश झाल्याने त्या आता नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभेवर दावा करू शकतात. ‘महाविकास आघाडी’च्या जागावाटपात सर्वाधिक वाटा घेण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याचे दिसते. काँग्रेसच्या वाट्याला १०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत दिसली एकी

राज्यातील काँग्रेस नेत्यांची असलेली एकी, जनतेची मिळालेली साथ यामुळे काँग्रेसला २०२४ पासून ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. सोलापुरातून प्रणिती शिंदे, उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहेत. भंडारा-गोंदियातून डॉ. प्रशांत पडोळे यांना विजयी करण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अमरावतीतून बळवंत वानखेडे यांना विजयी करण्यात यशोमती ठाकूर, लातूरमधून डॉ. शिवाजीराव काळगे यांना विजयी करण्यात अमित देशमुख, सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांना विजयी करण्यात विश्‍वजित कदम यांचा मोठा वाटा होता.

कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयात सतेज पाटील यांची कामगिरी मोलाची ठरली. शिर्डी लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भाऊसाहेब वाकचौरे यांनी लढविली. येथून वाकचौरेंचा ५० हजारांनी विजय झाला, या विजयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मिळवून दिलेल्या ३० हजार मताधिक्याचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी प्रभावी कामगिरी केल्याने त्याचे फळ त्यांना मिळाले. यामुळेच राज्यातील काँग्रेस नेत्यांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT