Maratha Reservation News Sarkarnama
विश्लेषण

Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @ जालना : दिवस पंधरावा, गावात पाठिंब्यासाठी रांगा आणि... भाग-६

Jagdish Pansare

Jalna Maratha Protest : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्या आधारे आरक्षणाच्या मागणीसाठी दि. २९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला ओ देत या आंदोलनात हजारो समाज बांधव सहभागी झाले आहेत. (Maratha Protest) एक ऑगस्टच्या लाठीचार्जनंतर आंदोलनाने उग्ररूप धारण केले. या काळात रास्ता रोको, मुंडण, जाळपोळ, दगडफेक, बंद अशा विविध प्रकारे त्या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त झाला. या लाठीहल्ल्याचा प्रसाद सरकारलाही मिळाला. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात लाठीहल्ल्याने ठिणगी पडली आणि त्याचा वणवा अक्षरशः महाराष्ट्रात पेटला. `शासन आपल्या दारी`, कार्यक्रम बाजूला ठेवून शासन जरांगेच्या दारी जाऊ लागले.

आठ कलमी कार्यक्रमाचा मसुदा घेऊन सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जीआरवर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांना सरकारने जीआरही दिला, पण निजामकाळातील वंशावळीत नोंद असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, या निर्णयाने पुन्हा घोळ घातला. (Maratha Reservation) जीआरनंतर जरांगे यांचे आंदोलन संपेल असा सरकारचा भ्रम होता. वंशावळीची अट न घालता सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण लागू करा, या नव्या जीआरसाठी जरांगे यांनी शिष्टमंडळाला चार दिवसांची डेडलाइन देत पुन्हा माघारी धाडले.

या चार दिवसांत अंतरवाली सराटीतील चित्रही बदलले. नेते, पुढाऱ्यांची गर्दी कमी होऊन तिथे जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची गर्दी वाढली. (Jalna) केवळ मराठवाडाच नाही, तर राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा अंतरवालीत लागल्या. (Marathwada) गावाच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि जरांगे यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी एखाद्या मंदिरात देव दर्शनासाठी रांगा लागाव्यात असे चित्र दिसू लागले. साडेपाच हजारहून अधिक संस्था, संघटनांकडून जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला.

माय-माऊलींच्या अश्रूंमुळे जरांगेंचं एक पाऊल मागं...

उपोषणाच्या पंधराव्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळ सोमवारी (दि.12) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय सांगण्यासाठी येणार आहे. जरांगे यांनी चार दिवसांची डेडलाइन संपल्यावर वैद्यकीय उपचार आणि पाणी घेणे सोडले होते. प्रकृती खालावल्याने उपस्थिती महिलांची काळजी वाढली. त्यांनी आम्हाला आरक्षणासोबत तुम्हीही हवे आहात, अशी जरांगे यांना साद घालत उपचार घेण्याची विनंती केली. आपल्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या माय-माऊलींचा मान राखत जरांगे यांनी सलाइन आणि थोडं पाणी घेतले.

आजचा दिवस निर्णायक?

उपोषणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जरांगे आपल्या सहकाऱ्यांशीही बोलणार आहेत. अंतरवालीतील आजच्या घडामोडी काही निर्णायक वळणावर येतात का? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याने आणि अंतरवालीतील आंदोलनाने हे छोटेसे गाव सध्या गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात या आंदोलनाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र नक्की.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT