Eknath Shinde On Milind Deora Sarkarnama
विश्लेषण

Milind Deora : देवरांचा प्रवेश दिल्लीत ठरला, शिंदेंना कानोकान नव्हती खबर !

Sachin Waghmare

संजय परब

Political News : दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, याची कानोकान खबर या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना नव्हती. प्रवेश देण्याच्या तासाभरापूर्वी त्यांनी तसे जाहीर बोलून दाखवले होते. अचानक दिल्लीवरून सूत्रे फिरली आणि स्वतः शिंदे यांना भगवा देवरा यांच्या हाती द्यावा लागला. आधी काँग्रेसमध्ये असा प्रकार होत होता, आता भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांमध्ये त्याचाच धडा गिरवला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी हे सर्व कठपुतली आहेत, अशी टीका केलीय.

अरविंद सावंत यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा (Milind Deora) यांचा पराभव केला होता. सावंत हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाले असताना देवरा यांना सुद्धा पुन्हा निवडणूक लढवायची असल्याने पेच निर्माण झाला होता. हा पेच अशासाठी की महाविकास आघाडीत आता हे आजी-माजी खासदार असल्याने दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार होती.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई ही आमची जागा असल्याचे आधीच काँग्रेसला सांगितले होते. काँग्रेसने सुद्धा ते मान्य केले होते. पण, देवरा यांना ते मान्य नव्हते. या जागेवर आपलाच अधिकार असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र ते शिंदे शिवसेनेत जातात का भाजपमध्ये हे निश्चित नव्हते. मुळात राज्यातील भाजप तसेच शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना याची कल्पना नव्हती. दिल्लीत याचा फैसला होईपर्यंत स्वतः एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांना ही बातमी नव्हती.

या जागेसाठी शिंदे यांच्या मनात यशवंत जाधव किंवा त्यांची पत्नी आणि आमदार यामिनी जाधव यांचा विचार सुरू होता. पण, दिल्लीतून त्यांना आदेश येताच शिंदेंना देवरा यांना पक्षात घ्यावे लागले. मुख्य म्हणजे त्यांना आता दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यावाचून पर्याय सुद्धा उरलेला नाही. देवरा यांचा शिंदे शिवसेनेतील प्रवेश म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप म्हणेल त्याला आणि ठरवेल त्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, याची ही झलक असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अखंड शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 13 खासदार शिंदे यांच्याकडे गेले असून फक्त 5 खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. पाच वर्षांपूर्वी निवडून आलेल्या सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणे फार कठीण दिसत असून भाजपचे दिल्लीतील नेते सांगतील त्याप्रमाणे उमेदवारी आणि चिन्ह ठरणार आहे. यामुळे आधीच शिंदे शिवसेनेच्या खासदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच धनुष्यबाणऐवजी हातात कमळ घ्यावे लागेल, या विचाराने त्यांची इकडे आड, तिकडे विहीर झाली आहे.

किरण सामंताची झाली पंचाईत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात धुसफुस सुरू झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी हवी आहे. मात्र, त्यांना धनुष्यबाणावर निवडणूक लढवायची आहे. पण, त्याला भाजप तयार नाही. या मतदारसंघातला उमेदवार हा भाजपचा असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे किरण सामंत यांची पंचाईत झाली आहे. त्यासोबतच प्रकार आता उर्वरित शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघात होणार असल्याने कमळ हातात घेता का बाहेर जाता? अशी अवस्था शिंदे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची झाली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT