Assembly special session 2024  Sarkarnama
विश्लेषण

Dheeraj Deshmukh On Maratha Reservation: मधल्या भावाचा सल्ला थोरल्याआधी धाकट्या भावाने मनावर घेतला...!

अय्यूब कादरी

Maratha Reservation Special Assembly Session Live Updates :

अनेक वर्षे सत्ता उपभोगलेले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री राहिलेले काँग्रेसह विविध पक्षांचे नेते संकटकाळात आपल्या पक्षांची साथ सोडत आहेत. अनेक वर्षे सत्ता उपभोगलेली असल्यामुळे अशा नेत्यांची संघर्ष करण्याची, रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करण्याची वृत्ती लोप पावलेली आहे.

सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे किंवा सत्तेत तरी सहभागी झाले आहेत. अशा प्रकारांवर अभिनेते रितेश देशमुख यांनी दोनच दिवसांपूर्वी आसूड ओढले होते.

दोनच दिवसांपूर्वी अभिनेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर आसूड ओढत आपले काका, विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्यावर जिवापाड प्रेम असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

राज्यातील राजकारणाची अवस्था प्रचंड वाईट झाली असून, आता तुमची राज्याला गरज आहे, पाऊल उचला, असे आवाहन मोठे बंधू, आमदार अमित देशमुख यांना केले होते. रितेश देशमुख यांचे हे आवाहन अमित देशमुख यांच्या आधी त्यांचे लहान बंधू आमदार धीरज देशमुख यांनी मनावर घेतल्याचे दिसते. मराठा आरक्षणासाठी आयोजित विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात २० फेब्रुवारी रोजी धीरज देशमुख यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

'फसवणूक नको, आरक्षण हवे,' असे लिहिलेले जॅकेट आणि एक मराठा लाख मराठा असे लिहिलेली टोपी परिधान करून आमदार धीरज देशमुख विधिमंडळात दाखल झाले. त्यांचे हे लक्षवेधी जॅकेट विधिमंडळात चर्चेचा विषय ठरले. सरकार प्रत्येकवेळी सांगत असते, की मराठा समाजाला आम्ही टिकणारे आरक्षण देणार आहोत.

मात्र, सरकार फसवणूक करत आहे, असे विरोधकांना वाटते, असे त्यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाची अधिसूचना दिली होती. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. गावी परत जाताच पुन्हा जरांगे पाटील यांना आंदोलन सुरू करावे लागले. याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशीही मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवळी येथील विलास साखर कारखान्यावर १८ फेब्रुवारीला विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी रितेश देशमुख यांनी केलेले ते भाषण प्रचंड व्हायरल झाले होते. या कार्यक्रमाच्या वेळीच मराठा आरक्षण आंदोलकांनी धीरज देशमुख यांना अडवून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, अशी मागणी केली होती.

त्यावेळी धीरज देशमुख यांनी अत्यंत संयत पद्धतीने आंदोलकांशी संवाद साधून हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचे प्रतिबिंब अधिवेशनात दिसून आले. भावाचा सल्ला आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन, यामुळे आमदार धीरज देशमुख सक्रिय झाल्याचे दिसून आले.

शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातही देशमुख बंधू सक्रिय होणार?

धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस सध्या मृतप्राय अवस्थेत आहे. अनेक वर्षे विविध सत्तास्थाने उपभोगलेली काँग्रेसची नेतेंमडळी आपल्या कोषात गेली आहेत. या नेत्यांनी गेल्या काही वर्षांत सरकारच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखवलेले नाही.

धाराशिव येथे काही तरुण नेतेमंडळी आंदोलने करतात, मात्र त्यांनाही या बड्या नेत्यांचा आधार मिळत नाही किंवा हे बडे नेते त्या आंदोलनांतही सहभागी होत नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसच्या राजकारणावर पकड होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे. देशमुख बंधू आता शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातही सक्रिय होणार का, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

तिकडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेही सरसावले...

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून विरोधकांचा आवाज क्षीण झाला. महत्त्वाचे नेते विरोधकाची भूमिका त्यागून सत्ताधारी झाले आणि राहिलेल्या अन्य काही सक्रिय नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागला. पक्ष सोडावा, यासाठी काहीजणांभोवती जाळे टाकण्यात आले. अशा प्रकारच्या राजकारणावरच रितेश देशमुख यांनी ताशेरे ओढले होते.

धीरज देशमुख यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. नितेश राणे उघड धमक्या देत आहेत, प्रक्षोभक भाषणे करत आहेत.

पोलिस आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत, असे ते उघडपणे बोलत आहेत. कायद्याला आव्हान देणाऱ्यांना पोलिस धडा शिकवतात. आता पोलिसांनी आमदार नितेश राणे यांनाही धडा शिकवावा, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT