Raj Thackeray Sarkarnama
विश्लेषण

MNS 18th Foundation Day : पहिल्या पाडवा मेळाव्यातून फुंकली होती नवचैतन्याची तुतारी

Sachin Waghmare

MNS Foundation Day Special Story : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘पाडवा मेळावा’ आयोजित करून यशस्वी केला. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवरील मैदानावरून विचारांचे सोने लुटत होते. त्यांच्या मेळाव्याला मोठा जनसागर लोटत होता.

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांची ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जपली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत एकत्र यावेत, या उद्देशाने 9 एप्रिल 2016 ला मुंबईत पहिला पाडवा मेळावा आयोजित केला होता. या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी सुरू केला होता. MNS 18th Vardhapan Divas

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर शिवाजी पार्क मैदानात मनसेचा गुढीपाडवा मेळावा घेऊन पक्षामध्ये नवचैतन्याची तुतारी फुंकण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठरविले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे झाली. या काळात झालेल्या लोकसभा-विधानसभेच्याच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मनसेला चमकदार कामगिरी बजावता आली नव्हती. त्याची खंत मनसे सैनिकाला वाटत होती.

शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काहीजण मनसेमध्ये दाखल झालेले काहीजण स्वगृही परतले, तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये अलीकडे कमालीची मरगळ आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर करून त्यांना पुन्हा नव्या दमाने पक्षाच्या कामाला लावण्यासाठी त्यांनी मेळावा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनीच पाडवा मेळाव्याचा संकल्प सोडल्याने येत्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला नारळ शिवाजी पार्कवर फोडण्याचा मान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेला मिळाला.

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाल्यानंतर शिवसेनेने पक्षाचा पहिला मेळावा शिवाजी पार्कवर घेतला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी सेनेचा दसऱ्या दिवशी मेळावा साजरा होतो. याच धर्तीवर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पाडवा मेळावा घेण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळेस मुंबईसह नाशिक व पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलाच ‘पाडवा मेळावा’ मुंबईत शिवाजी पार्क येथे होणार होता. या मेळाव्याला परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी एका संस्थेने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे पक्षाने जाहीर केलेल्या नियोजित वेळेत हा मेळावा होणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. ध्वनिप्रदूषण होणार नाही, यासह काही अटींवर कोर्टाने दोन दिवस आधीच या मेळाव्याला परवानगी दिली होती. त्यामुळे कमी वेळेत मेळाव्याची सर्व तयारी करण्यासाठी मनसेच्या पदधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित केलेला ‘पाडवा मेळावा’ यशस्वी करण्यासाठी सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते मुंबईला यावेत, यासाठी पक्षाची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पाडवा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी प्रत्येक शहरातून मोठया संख्येने मनसे सैनिकांना साद घालण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला ‘गुढीपाडवा मेळावा’ शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. मनसेचा हा पहिलाच मेळावा असल्याने यासाठी विशेष लक्ष देऊन तयारी करण्यात आली होती. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी सावरकर स्मारकाच्या समोरच्या बाजूस शिवतीर्थावर 32 बाय 60 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते.

आपल्या सभांमधून वादग्रस्त विधाने व अजब सल्ले देणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या रिक्षा जाळा आंदोलनाच्या हाकेनंतर या सभेत काय बोलणार ? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. त्यासोबतच राज ठाकरे या मेळाव्यात पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.

राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या पहिल्याच पाडवा मेळाव्यातून सत्ताधारी व विरोधकांवर घणाघाती टीका करीत राज्य सरकारच्या कारभाराची पिसे काढली होती. त्यासोबतच 2017 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेदेखील सत्ताधारी व विरोधकांना एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) गुढी पाडवा मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध घाला, अशी मागणी करणाऱ्यावर त्यांनी या मेळाव्यातून बोचरी टीका केली होती. त्यासोबतच मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या कारभाराची खिल्ली उडवली होती.

यावे ळी शिवसेनेच्या (Shivsena) धोरणावर व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) शेलक्या शब्दांत टीका करून त्यांनी २०१७ मध्ये होणाऱ्या राज्यातील महापालिका निवडणुकीचे रणशिंग या मेळाव्याच्या माध्यमातून फुंकले होते. मनसेचा हा पहिलाच पाडवा मेळावा होता. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. दुसरीकडे या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत आलेली मरगळ दूर करीत नवसंजीवनी देण्यात ते यशस्वी झाले होते.

R

SCROLL FOR NEXT