थोडक्यात बातमीत काय आहे?
ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र : मुंबईच्या विजयी मेळाव्यानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले, त्यामुळे युतीची चर्चा जोरात सुरू झाली.
उद्धव यांची युतीसाठी सकारात्मक भूमिका : उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलो ते राहण्यासाठी” असे विधान करत युतीची इच्छा स्पष्ट केली.
राज ठाकरे सावध पवित्र्यात : राज यांनी माध्यमांशी संवाद थांबवण्याचे आदेश देत युतीबाबत साशंकता निर्माण केली असून, नोव्हेंबर-डिसेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल असे संकेत दिले.
Thackeray Brothers Reunion : मुंबईतील विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. या मेळाव्याच्या तयारीपासून ते तो पार पडेपर्यंत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केली जात होती.
शिवाय राज्य भरात हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचा आनंदोत्सव ठाकरेंच्या समर्थकांकडून साजरा केला गेला. त्यामुळे आता पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार, असं गृहीतच धरलं जात होतं.
त्याचं कारण म्हणजे विजयी मेळाव्यातील भाषणातून खुद्द उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, असं म्हटलं होतं. शिवाय जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असंही ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज-उद्धव एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा सुरू होताच विरोधकांनी थेट राज यांची बाजू घेत उद्धव ठाकरेंनी त्यांना याआधी कशी वागणूक दिली याची आठवण करून दिली. यामध्ये भाजप नेते नारायण राणे आघाडीवर होते. तर इतर महायुतीतील नेत्यांनी देखील राज यांच्यावर टीका न करता उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती.
त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांमुळे विरोधकांची धाकधूक थोडी का होईना वाढल्याचं चित्र होतं. तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच राज यांच्या एका आदेशामुळे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का? यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. कारण मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज यांनी मनसैनिकांना आणि नेत्यांना मला विचारल्याशिवाय पक्षातील कोणीही माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावरही व्यक्त व्हायचं नाही, असा आदेश दिला.
त्यांच्या या आदेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून आता संभ्रम नको युतीबाबात योग्य ती भूमिका घ्यावी अशी साद राज ठाकरेंना घातली गेली. तर त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे युतीबाबात सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे राज मात्र सावध भूमिका घेत युतीचा निर्णय पुढे ढकलत असल्याचं दिसत आहे.
"मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं मोठं वक्तव्य राज यांनी केलं आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं ते नाशिक येथील अनौपचारिक गप्पादरम्यान बोलल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी हात पुढे केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये मनसेशी युती करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपण या युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव यांनी म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर युतीसाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू असून निवडणुका जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवाय मराठीच्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असून ते यानंतरही सुरू राहतील. मेळाव्यानंतर फक्त आपल्यावर टीका केली गेली, असंही त्यांनी या गप्पांमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरेसेना युतीसाठी आग्रह असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे मात्र याबाबत उघड आणि स्पष्ट बोलत नसल्याने उद्धव ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे कला आहे. मात्र, त्यांना टाळी देण्यासाठी राज ठाकरे टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकांनी विचारलेले प्रश्न :
प्रश्न: ठाकरे बंधू किती वर्षांनी एकत्र आले?
उत्तर: ठाकरे बंधू सुमारे 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले.
प्रश्न: उद्धव ठाकरे यांची युतीबाबत भूमिका काय आहे?
उत्तर: उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रश्न: राज ठाकरे यांची भूमिका काय आहे?
उत्तर: राज ठाकरे युतीबाबत सावध असून अंतिम निर्णय पुढे ढकलला आहे.
प्रश्न: युतीबाबत निर्णय कधी अपेक्षित आहे?
उत्तर: युतीचे चित्र नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान स्पष्ट होईल, असे राज यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.