Nitish Kumar, Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Karpoori Thakur : कर्पूरी ठाकूर यांना हायजॅक करीत भाजपचा नितीशकुमारांना चेकमेट!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai : भाजप निवडणूक जिंकण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाही. विशेष म्हणजे कलम 370 हटवत आणि राममंदिर साकारत 2024 ची लोकसभा निवडणूक आम्ही कधीच जिंकलीय, आता आम्ही 2029 चा विचार करीत आहोत, असे आता खुलेआम सांगणाऱ्या भाजपने बिहारच्या नितीशकुमार यांच्या गडाला हादरा दिला आहे. जातीनिहाय जनगणना करीत भाजपच्या एक पाऊल पुढे गेलेल्या नितीश यांना चेकमेट देण्याची खेळी भाजपने केलीय. त्याला निमित्त ठरले आहे ते बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याचे. कर्पूरी ठाकूर यांची जन्मशताब्दी जोरात साजरी करीत मागासवर्गीय जाती जमातींमध्ये आपलं स्थान घट्ट करणाऱ्या भाजपने कर्पूरी यांना भारतरत्न देत त्यांना हायजॅक केले आहे.

लोहिया यांनी उभारलेल्या संयुक्त विधायक दलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्पूरी यांना मिळालेले मुख्यमंत्रिपद त्या काळी सर्व देशात चर्चेचा विषय होते. अतिशय साध्या, प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकप्रतिनिधीला मिळालेले ते सर्वोच्च स्थान होते. नाभिक समाजाच्या कर्पूरी यांनी या पदाची गरिमा वाढवताना सर्वांसमोर मोठा आदर्श ठेवला होता. त्यांची पत्नी शेतकाम करायची आणि मुलीचे लग्न एखादा गरीब शेतकरी आपल्या घरात लग्नकार्य करेल, इतक्या कमी खर्चात त्यांनी लावून दिले होते. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, नाथ पै आणि मधु दंडवते या महान नेत्यांच्या आदर्शाचा तो हुंकार होता. आता त्याच कर्पूरी यांना आपल्या तंबूत आणत बिहारमधील (Bihar) 26 टक्के अतिपिछडा दलित वर्गाला आपल्या बाजूला खेचण्याचा भाजपचा (BJP) खेळ सुरू झाला आहे.

बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी जातीनिहाय जनगणना करीत भाजपला दणका दिला होता. विशेष म्हणजे या राज्यात मोठ्या संख्येने दलित आणि इतर मागासवर्ग असल्याने ही व्होट बँक आपल्याकडे कशी राहील, याची सुरुवातीपासून नितीश यांनी काळजी घेतली आहे. स्वतः नितीश हे याच मागास वर्गातील कुर्मी या जातीचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने आजही या जातीसह सर्व अतिपिछडा वर्ग हा नितीशकुमार यांना आपला मानत होता. पण, जातीनिहाय गणनेत कुर्मी यांची संख्या अतिशय कमी असल्याचे दिसल्याने भाजपने आता ही जमात सोडून इतर मागासवर्गीय यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याचा एक भाग म्हणजे कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना दिलेले भारतरत्न (Bharat Ratna) होय!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरे तर नितीश यांनी याआधीच कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ यांना दोनदा राज्यसभेवर पाठवत पिछडा वर्गात मी तुमच्या बाजूचा आहे, असा एक संदेश दिला होता. पण, लालूप्रसाद यांच्याबरोबरच्या आघाडीमुळे ही जातीपातीची, मतांचीसुद्धा नितीश यांची गणिते सध्या बिघडली आहेत आणि याचा फायदा भाजपने घ्यायला सुरुवात केली आहे.

भाजपचा तसा कर्पूरी ठाकूर यांच्याशी काडीमात्र संबंध नाही. तसेच बिहारमध्ये त्यांना जनाधारसुद्धा नाही. मात्र नितीश यांच्याशी युती करीत आधी भाजपने बिहारमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. नितीशकुमार यांच्याबरोबर सत्तेतसुद्धा ते सहभागी झाले होते. मात्र सुरुवातीला आपला हात हातात घेऊन नंतर ते आपल्याला बाजूला सारणार ही भाजपची कुटनीती वेळीच नितीश यांच्या लक्षात आल्याने त्यांनीच भाजपला दूर करीत लालू यांना जवळ केले. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला असून त्याचे उट्टे फेडण्याची ते संधी शोधत आहेत. ही संधी आता कर्पूरी यांच्यानिमित्ताने त्यांना मिळाली आहे.

कर्पूरी यांच्या जन्मशताब्दीचा मोठा गाजावाजा करीत भाजप सध्या बिहारच्या कानाकोपऱ्यात आपलं बस्तान बसवू पाहत आहे आणि त्याचा एक भाग म्हणजे प्रजासत्ताकदिनाच्या दोन दिवस आधी त्यांनी कर्पूरी यांना जाहीर केलेले भारतरत्न होय. भाजपचा हा डाव म्हणजे मतांचा जुगाड आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

(Edited By – Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT