Harshwardhan Sapkal Sarkarnama
विश्लेषण

MNS And MVA Satyacha Morcha : सत्याचा मोर्चापासून सपकाळ अन् गायकवाड दूर? काय प्रॉब्लम आहे?

Harshwardhan Sapkal and Varsha Gaikwad Absent from MNS-MVA ‘Satyacha Morcha’ in Mumbai : मुंबईतील मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड दूर असल्याचे दिसले.

Pradeep Pendhare

Mumbai rally : मतदार चोरी, मतदार याद्यांमधील घोळांविरोधात मनसे अन् महाविकास आघाडीने आज निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयावर 'सत्याचा मोर्चा' नेला. या मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे प्रमुख नेते अलिप्त राहिल्याचे दिसले.

विशेष करून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड हे मोर्चाच्या सकाळपासून दूर दिसले. हर्षवर्धन सपकाळ तर, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये देखील सहभागी झाले नाही. त्यामुळे काँग्रेस नेमकं कोणतं पाॅलिटिक्स खेळत आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून अलिप्त राहण्याचे धोरण ठेवलं आहेत का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं. मात्र विधानसभा निवडणुकीत सर्व वातावरण फिरलं. देशातील बहुतांशी मोठ्या राज्यात भाजप (BJP) महायुतीला यश मिळालं आहे. तुलनेत छोट्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आणि काही मूठभर विरोधकांची सत्ता दिसते. लोकसभेला देशभरात इंडिया आघाडीसाठी वातावरण असताना, सत्तेपासून दूर कसे राहिलो, याचा अभ्यास काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी त्याचा अभ्यास केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांची टीमने मतदार याद्यांचा अभ्यास करत, मतदार याद्यांतील घोळ समोर आणला. यातून देशभरात मत चोरीचा मुद्दा सुरू झाला. राहुल गांधी यांनी या मत चोरी, या मतदार याद्यांमधील घोळावर वारंवार पत्रकार परिषदा घेऊन भाष्य केले. राहुल गांधी यांनी यावर पाॅवरपाइंट प्रेझेंटेक्शन दिले. यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आणि सत्ताधारी भाजप महायुतीकडून त्याला निवडणूक आयोगाच्या अगोदर उत्तर देण्यास सुरूवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेमुळे कुठेतरी मत चोरी झाल्याच्या शंकेला अधिकच हवा मिळाली.

मत चोरीचा मुद्दा तापत असतानाच, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे, या दोघा बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्या. ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढून, आता कौटुंबिक वातावरण निर्माण झालं आहे. यातच दोघा बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबईसाठी एकत्र येण्याचे संकेत दिले. राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये दिसू लागले आहेत. यातून ते भाजप सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. यातच मत चोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाविरोधात सत्याचा मोर्चाची घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली.

या सत्याच्या मोर्चात मनसेची एन्ट्री होताच काँग्रेस रिव्हर्स झाली. महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चांच्या बैठकांपासून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दूर झाले. महाविकास आघाडीला सध्या नव्या भिडूची गरज नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस मनसेच्या एन्ट्रीवर नाराज आहे, असे आपसूक संदेश गेला.

मनसेने मुंबईत हिंदीचा मुद्दा उचलून धरला होता. यातून हिंदी भाषकांवर हल्ले झाले. मुंबईमध्ये बिहारमधील हिंदी भाषिक मतदार खूप आहे. त्याचा फटका बिहारच्या निवडणुकीत बसेल, म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आताच मनसेची एन्ट्री महाविकास नको होती, अशी चर्चा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यापाठोपाठ मुंबईच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड देखील दूर असल्याचे दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीत या सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने अलबेल नसल्याचे समोर आलं.

काँग्रेसचे थोरात, वडेट्टीवार, पाटील सहभागी

मुंबईत आज सत्याचा मोर्चा निघाला. या मोर्चात सर्वाधिक चर्चा राहिली ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची! या मोर्चात, काँग्रेस कुठेही झेंडे दिसले नाही. परंतु प्रतिनिधी म्हणून नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, सचिन सावंत हे सहभागी झालेले दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे नेते मोर्चात सहभागी झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, किसान सभेचे प्रमुख अजित नवले यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या संघाटनांचे प्रतिनिधी या सत्याच्या मोर्चात सहभागी झाले आहेत.

'मनसे'चे एन्ट्री काँग्रेसला झोंबली आहे का?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड या सहभागी झालेल्या दिसत नसल्याने, महाविकास आघाडीत 'मनसे'चे एन्ट्री काँग्रेसला झोंबली आहे का? असा प्रश्न चर्चेत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना मनसेचा काही प्रॉब्लम आहे का? हर्षवर्धन सपकाळ थेट बोलत नसले, तरी काँग्रेस पक्ष नेतृत्वाने मात्र, याबाबत देखील काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भविष्यात मात्र काय निर्णय होता, याकडे लक्ष असणार आहे. शरद पवार यावर काहीतरी तोडगा काढतील, आणि मुंबईत महाविकास आघाडीत काँग्रेस आणि मनसे समन्वयाची भूमिका घेतली, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT