Narendra Modi_Rahul Gandhi 
विश्लेषण

Congress: शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटणार? PM मोदींचे संकेत; नेमका काय खेळ सुरुए?

Narendra Modi on Congress: सत्तेसाठी काहीही असं काहीसं सध्या भारतीय राजकारणाचं स्वरुप बनलेलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली याचीच पुनरावृत्ती काँग्रेसच्या बाबतीत होण्याची चिन्हं आहेत.

Amit Ujagare

नवी दिल्ली : सत्तेसाठी काहीही असं काहीसं सध्या भारतीय राजकारणाचं स्वरुप बनलेलं आहे. त्यातूनच महाराष्ट्रात साधारण तीन वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आणि त्यांची दोन गटांत विभागणी झाली. याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. पण यावेळी काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची फूट पडू शकते असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. बिहारमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर दिल्लीतील मुख्यालयात सेलिब्रेशन करताना मोदींनी आपल्या भाषणात याबाबत भाष्य केलं. त्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांनंतर आता काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावर शकलं होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अर्थात पंतप्रधानांनी चर्चेसाठी सोडून दिलेलं हे पिल्लू असलं तरी भाजपच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

बिहारच्या विजयनानंतर दिल्लीत बोलताना मोदी म्हणाले, "मी हे गांभीर्यानं सागू इच्छितो की, आज काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस अर्थात एमएमसी बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा सध्या यावरच चालतो आहे. त्यामुळं काँग्रेसच्या अंतर्गतच आता वेगळा गट तयार होऊ पाहत आहे. जो या नकारात्मक राजकारणावर समाधानी नाही. काँग्रेसचे नामदार सध्या काँग्रेसला ज्या मार्गावर घेऊन चालले आहेत, त्यामुळं काँग्रेस अंतर्गत मोठी निराशा, नाराजी जन्म घेत आहे. त्यामुळं मला तर शंका आहे की, कदाचित यापुढे काँग्रेसचं आणखी एक मोठं विभाजन होऊ शकतं. काँग्रेसचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांना देखील आता हे कळलं आहे की, काँग्रेस आपल्या नकारात्मक राजकारणात सर्वांना एकाचवेळी बुडवत आहे"

कारस्थानांचं राजकारण देशाला कुठे नेणार?

दरम्यान, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे काँग्रेसमध्ये भविष्यात फूट पडू शकते असे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदी हे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत, त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं विधान करणं म्हणजे भाजपकडून खरोखरच काँग्रेसमधील अस्वस्थ गटाला वेगळं काढण्यासाठीच काही हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. पण भविष्यात खरोखरच असं काही झालं तर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडू शकते. वरवर काँग्रेसमधील अंतर्गत खळबळीचा संदर्भ दिला जात असला तरी त्याला हवा देण्याचं कट-कारस्थानांचं राजकारण मात्र देशाचं नुकसान करणार ठरु शकतं. कारण यापूर्वीच जनतेनं निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिलेल्या घटनात्मक सरकारांमधील आमदार फोडून त्यांचा वेगळा गट बाहेर काढून भाजपनं त्यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याची अनेक उदाहरण आहेत.

काँग्रेस मोदींचं विधान किती गांभीर्यानं घेणार?

त्यामुळं अशा प्रकारे पक्ष फोडण्याची आणि सरकारं पाडण्याची कृती हा भारतीय संविधानाशी केलेला द्रोह ठरु शकतो. कटकारस्थानांच्या या राजकारणामुळं देशातील विविधतेत एकता या विचारधारेच्या, संस्कृतीच्या तत्वालाच तिलांजली देण्यासारखं आहे. त्यामुळं पंतप्रधानांचे दिल्लीत केलेल्या जाहीर भाषणातील शब्द हे केवळ टीका करणारे शब्द ठरत नाहीत. तर त्यांच्या यापूर्वीच्या भाषणांचा संदर्भ दिल्यास त्यांनी जे म्हटलं तेच करुन दाखवलं, याची अनेक उदाहरणं दिली जाऊ शकतात. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसच्या विभाजनाचं भाकीत काँग्रेस नेते किती गांभीर्यानं घेतात आणि त्याप्रमाणं आपल्या राजकारणात काही महत्वाचे बदल करतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT