Shiv Sena leader and Minister Tanaji Sawant intensifies the political conflict in Dharashiv (Osmanabad) Sarkarnama
विश्लेषण

Tanaji Sawant Vs NCP : दोन्ही राष्ट्रवादी तानाजी सावंतांच्या डोक्यात का गेल्यात? नेमकं दुखणं काय?

NCP vs Tanaji Sawant controversy News : माजी मंत्री तानाजी सावंत नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील भूमिका घेत असतात. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी मंत्री तानाजी सावंत नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील भूमिका घेत असतात. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. वर्षभरापूर्वीच त्यांनी कॅबिनेटच्या मीटिंगला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासोबत बसल्यानंतर मळमळ होते असे विधान केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. '2022 ला सत्तांतर केल्यानंतर मी एकमेव युतीतील आमदार आहे जो बोलत होतो ही परिस्थिती राहणार नाही. कारण, राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं त्यांच होतं. वर्षाच्या आतच ते खरं ठरले' असे विधान केले. त्यामुळे सावंत यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच आता तानाजी सावंत एवढे आक्रमक का झाले आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री असलेल्या सावंतांना निवडणूक जड गेली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार राहुल मोटे यांच्याविरुद्धच्या शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या लढतीत अवघ्या दीड हजार मतांनी विजय मिळवला होता. तर 2014 साली देखील त्यांना एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांच्यामुळे निवडणूक त्यांना जड गेली होती.

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. त्यामुळेच सावंत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत फारसे पटत नाही. नेहमीच त्यांचा या नेत्याशी वाद असल्याने त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी फारसे जुळत नाही. त्यामुळेच तानाजी सावंत नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करून अडचणीत आणणारे वक्तव्य करीत असतात. त्यातच दोन महिन्यापूर्वीच त्यांचे कट्टर विरोधक असलेले राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आलेल्या राहुल मोटे यांच्याशी जुळवून घेताना तानाजी सावंत यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत.

चार दिवसापूर्वीच परंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विरोधात महायुतीमधील इतर पक्षाने एकत्र येत मोट बांधली आहे. त्यामुळे तानाजी सावंत चांगलेच भडकले आहेत. भाजपचे (BJP) माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, उर्वरित शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व माजी आमदार राहुल मोटे यांनी एकत्र येऊन आघाडी करीत निवडणूक लढविण्याचे प्लॅनिंग केले आहे. त्यासाठी नुकतीच बैठकही पार पडली. त्यामध्ये सर्व काही रणनीती आखली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही तानाजी सावंत एकाकी पडल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे धाराशिवचे शिंदे सेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात आडवा विस्तवही जात नव्हता. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी जुळवून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात देखील तानाजी सावंत यांची अडचण झाली आहे. त्यामुळेच व्यक्तिगत द्वेषातूनच सावंत हे राष्ट्रवादीवर आरोप करीत वाद ओढवून घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT