Abhijeet Patil-Bhagirath Bhalke-Kalayanrao Kale
Abhijeet Patil-Bhagirath Bhalke-Kalayanrao Kale Sarkarnama
विश्लेषण

Pandharpur Politics: अभिजित पाटलांना राष्ट्रवादीची उमेदवारी...? काळे-भालके काय करणार...?

विजय दुधाळे

सोलापूर: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिले. पवारांचे हे संकेत भगिरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना धक्का मानला जात आहे. विठ्ठल परिवारात यापूर्वीच फूट पडली आहे, त्यानंतर अभिजित पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत दोन गटात विभागली गेली आहे. पाटलांना उमेदवारी मिळाली तर भालके आणि परिवारातील दुसरा गट काय करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (NCP nomination for Abhijit Patil; What will kale and Bhalake do?)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर पवार हे प्रथम पंढरपुरात (pandharpur) अभिजित पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आले. श्री विठ्ठल कारखाना, पंढरपूर हे पवारांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असलेले घटक आहेत. त्यामुळे विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमासाठी येणे हे फार महत्वाचे नसले तरी मागील आठवड्यातील घडामोडीमुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. याच दौऱ्याची संधी साधत अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि त्यांच्या उमेदवारीचे संकेत या गोष्टी सर्वदूर पोहोचल्या आहेत.

मागील काही काळापासून पवारांकडून अभिजित पाटील यांना बळ मिळत असल्याचे दिसून येत होते. मग तो कुर्डुवाडीतील विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमानंतर पवारांच्या गाडीतून झालेला प्रवास, आमदार रोहित पवार यांनी विठ्ठल कारखान्यावर येऊन केलेली चर्चा या गोष्ट पाटील यांचा राष्ट्रवादीकडे असलेला ओढा याचे स्पष्ट संकेत देत होत्या. मुळात पंढरपुरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे; पण ती गटांमध्ये विखुरली आहे. ती एकत्र आणण्याचे काम भारतनाना भालके यांनी यशस्वीपणे केले आणि आमदारकीची हॅट्‌ट्रीक केली. ती कला त्यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना जमली नाही.

पंढरपुरात आलेल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी स्वतंत्र मंडप मारून आपला सवता सुभा कायम राहणार असल्याचे विठ्ठल परिवारातील भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) , कल्याणराव काळे (Kalyanrao Kale), युवराज पाटील आणि गणेश पाटील या नेत्यांनी दाखवून दिले आहे. पण, आमदारकीचा ध्येय गाठण्यासाठी परिवारातील इतर नेत्यांना कार्यक्रमापुरते तरी सोबत घेण्याचा मोठेपणा अभिजित पाटीलही दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे आता आमदारकीची वाट पाटील यांना वाटती तितकी सोपी नाही.

विधानसभेला राष्ट्रवादीला अगोदर आपापसांतील वाद मिटवावा लागणार आहे. पोटनिवडणुकीच्या वेळीही असाच प्रकार झाला होता. भगीरथ भालकेंच्या उमेदवारीला विठ्ठल परिवारातील काही नेत्यांनीच त्यावेळी विरोध केला होता. त्यामुळे ताकद लावूनही पंढरपुरात निसटता का होईना प्रशांत परिचारकांनी आमदार समाधान आवताडेंना मताधिक्य दिले होते. त्यामुळे दुखावलेले परिवारातील इतर नेते विरोधकांच्या मदतीला जाणार नाहीत याचीही काळजी पाटील यांना घ्यावी लागणार आहे.

तसेही ते अभिजित पाटील यांना मदत करतील काही नाही, याची शंकाच आहे. कारण, पंढरपूर बाजार समितीच्या निवडणुकीत विठ्ठल परिवार एक होऊ शकला नव्हता. काळे-भालके गटाने उघडपणे परिचारकांचे समर्थन केले होते. त्यामुळे उमेदवारीचे संकेत मिळाले असले तरी निवडणुकीच्या वेळी ती प्रत्यक्षात मिळेपर्यंत आणि मिळाली तरी जिंकेपर्यंत बरीच मोठी मजल अभिजित पाटील यांनी मारावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT