NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची इच्छा वर्धापनदिनाच्या मेळाव्यात व्यक्त केली. आता नव्या पिढीला संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले. त्यानंतर काही वेळाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारही त्याबाबत सकारात्मक दिसले. त्यांनी जयत पाटील यांची इच्छा अमान्य न करता यासंदर्भात सामूहिकपणे निर्णय घेऊ, असे सूचक विधान केले. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी संपूर्ण राज्याबाबतही भाष्य केले.
प्रदेशाध्यक्ष बदल
मेळाव्यातील भाषणात बोलताना शरद पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याशिवाय तरूणाईल पुढे आणण्याबाबतही महत्वाचे विधान केले. ते म्हणाले, जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की, "आता नव्या पिढीला संधी द्या". तुम्ही- आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया. एवढंच सांगू इच्छितो की, प्रमुख सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्याशी या विषयावरती आम्ही सुसंवाद साधू. सामूहिकपणाने या संदर्भातला निर्णय घेऊ.
जिल्हा-तालुक्यातही बदल
तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन पिढी, नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत, असे सांगत शरद पवारांनी संपूर्ण राज्यात भाकरी फिरविण्याचे संकेत दिले आहेत. कर्तुत्व असलेले हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो, असा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हा सर्वांची तयारी असली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
निवडणूक स्वतंत्रपणे की मविआतून?
दोन- तीन महिन्यांत निवडणुका येतील, त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या? एकट्याने लढवायच्या? काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या? याचा विचार त्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करण्याची वेळ आज आलेली आहे. हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे, आणखी एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांत दिसेल, असे स्पष्ट करताना पवारांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांवर सोपवल्याचे दिसते.
इतिहास घडवू
आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं? ५० टक्के भगिनींच्या जागेमध्ये कर्तुत्ववान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा पुढे आणायच्या? या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की, जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आपण येत्या तीन महिन्यांच्या निवडणुकीच्यानंतर सबंध महाराष्ट्रासमोर नवी नेतृत्व आणू आणि त्यांच्या कर्तृत्वातून इतिहास घडवू, असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.