Narendra Modi & Nitesh Kumar Sarkarnama
विश्लेषण

Modi's Guarantee Nitish Surrender : पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर नितीशकुमार यांचा शिक्का

Sachin Deshpande

Maharashatra in Queue : नरेंद्र मोदी यांच्यासमोर एकवेळचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नितीशकुमार आता फक्त बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या संगीत खुर्चीत व्यस्त आहेत. या संगीत खुर्चीत नेहमी तेच जिंकतात, हे त्यांचे भाग्य आहे. नवव्यांदा नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री होणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘करिश्मा’ आहे.

नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करीत इंडिया आघाडीला राम राम केला. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पण इंडिया आघाडीला सोडून कोणी राजकीय संन्यास घेतला तर आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळविस्तार पुढील काळात होईल.

बिहारचे दोन वेळचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे ‘आयकॉन’ तसेच जननायक कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न दिल्यापासून नितीशकुमार इंडिया आघाडीसाठी ‘नॉटरिचेबल’ होते. नितीशकुमार पाटण्यात कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यापूर्वी केंद्रातील भाजपाने जोरदार फासे फेकत कर्पूरी ठाकूर यांना नितीश यांच्या पाटण्यातील सोहळ्यापूर्वीच भारतरत्न घोषित केले आणि त्या फाशात नितीशकुमार सरळ भाजपाकडे ओढले गेले.

गेली अनेक वर्षे मागणी करूनही कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाले नाही. यंदा मात्र ते देण्यात भाजपानेदेखील काटकसर केली नाही. ‘सीट शेअरिंग’च्या मुद्द्यावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘टाटा टाटा, बाय बाय’ करीत काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला सोडले. त्यानंतर लगेच पंजाबचे मुख्यमंत्री ‘आप’चे भगवंत मान यांनी इंडिया आघाडीला डोळे दाखविले. इतक्यावरच ही परिस्थिती थांबली नाही, तर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणात आणि मुख्य म्हणजे जातीय समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजवादी विचारसरणीचे नितीशकुमार यांना एनडीएमध्ये ओढत बिहारमध्ये डबल इंजिनची तुतारी फुंकली जाईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारच्या विकासकामांना गती, राज्याच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय, मोठ्या ‘प्रोजेक्ट’चे भूमिपूजन अशा अनेक गोष्टी आता बिहारमध्ये जलदगतीने घडतील. नितीश यांच्या जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्या संयुक्त प्रचाराचे नारळ फोडले जाईल. 2019 मधील लोकसभेची स्थिती पाहिल्यावर जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्या मतांची गोळाबेरीज केली तर तिथे इतर राजकीय पक्षांचा टिकाव लागू शकत नाही, अशीच काय ती परिस्थिती आहे. भाजपाने नितीश यांना मुख्यमंत्री करीत मतविभाजन टाळले. त्याचबरोबर मतांची गोळाबेरीज केली. त्याची प्रचीती लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसेल.

नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम करण्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. नितीश यांनी पंतप्रधानपदावर दावा केला नव्हता. काँग्रेसने नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीचे संयोजकपद नाहक नाकारले. ते पद दिले असते तर नितीशकुमार तिथे कार्यरत राहिले असते. पण, ममता यांनी नितीशकुमार यांना विरोध केल्याचे सांगत काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीत मोठे पद दिले. महाराष्ट्रात पण इंडिया आघाडीने मोठे पद कोणाला दिलेले नाही. त्यामुळे भविष्यात भाजपाच्या देशातील आक्रमक भूमिकेसमोर राज्यात राजकीय संन्यास घेण्याचा कल विरोधकांचा राहील.

एकूणच 2024 मधील लोकसभा निवडणूक एकतर्फी होण्याचे चिन्हे तूर्तास तरी निर्माण होताना दिसत आहे. राजकारणात पडद्यामागे होणाऱ्या घडामोडी या संपूर्ण राजकीय चित्र लगेच स्पष्ट होऊ देत नाहीत. त्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि देशातील राजकारण टोकावर असताना न्याय यात्रेचे अनावश्यक सोंग काँग्रेसला राजकीयदृष्ट्या गाफिल ठेवत आहे. सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या ‘हिंदी बेल्ट’मध्ये राम मंदिर निर्माणाचा मोठा ‘इम्पॅक्ट’ असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटीची हवा चालली तर अनेकांचे ‘डिपॉझिट’ जप्तीचे चित्र लोकसभा निवडणुकीत राहील.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT