<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>

Ajit Pawar

 

सरकारनामा

विश्लेषण

मंडळांच्या अवास्तव मागणीला अजितदादांनी धुडकावले.. पुण्यासाठी योग्य निर्णय़

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यातील संभाजी पूलावरून (Sambhaji Bridge) जाणाऱ्या मेट्रोच्या (Pune Metro) गर्डरचे बंद असलेले काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मेट्रो प्रशासनाला दिले आहेत.अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले काम उद्या पहाटेपासून सुरू होत आहे.पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे तीन महिन्यांनी का होईना मेट्राचे काम सुरू होतेय हे महत्वाचे आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत काही गणपती मंडळाच्या मिरवणुकीला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे संभाजी पूलावरून जाणाऱ्या मेट्रो पुलाची उंची वाढविण्याची मागणी शहरातील काही गणेश मंडळांनी केली होती. मंडळांच्या मागणीप्रमाणे प्रत्यक्षात त्याप्रकारे उंची वाढविणे शक्य नव्हते.परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद होते. काम बंद असल्याने मेट्रोच्या कामावर त्याचा परिणाम झाला. शिवाय काम बंद राहिल्याने रोज सहा लाख रूपयांचे अर्थिक नुकसान होत होते.

मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न महापौर मुरलीधर मोहोळ तसेच मेट्रोच्या आधिकाऱ्यांनी केला. त्यासाठी दोन-तीनवेळा बैठका घेतल्या. शेवटी महापौरांनी मंडळांना आवाहन केले. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते ही भूमिका समजून घ्यायला तयार नव्हते. त्याचा परिणाम कामावर झाला .तीन महिने वाया गेले. काम बंद पडले.पुणे मेट्रोचे अर्थिक नुकसान झाले ते वेगळेच.महत्वाचे म्हणजे आधीच उशीर होत असलेल्या मेट्रोच्या कामाला आणखी उशीर होत आहे. विकासाच्या कामात अडथळा येणारी अव्यवहार्य भूमिका कुणीही घेऊ नये, असे संबंधितांना सांगण्यात आले. मात्र, काही मूठभर लोक ऐकायला तयार नव्हते. अजित पवार यांच्या पद्धतीने निर्णय झाला असून आता पोलीस बंदोबस्तात काम करण्यात येणार आहे.

विकासाच्या कामात समाजातील सर्वच घटकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, मेट्रोची उंची वाढविण्याची मागणी करणाऱ्या मंडळींना याच विसर पडल्याचे दिसते. त्यातूनच मेट्रोच्या कामाचे महत्वाचे तीन महिने वाया गेले. काम लांबणीवर पडले शिवाय मोठे अर्थिक नुकसान झाले.पालकमंत्री पवार यांच्या आदेशाने उद्यापासून कामाला सुरवात होईल. मात्र, या साऱ्या प्रकरणात बंधित मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर गणेश मंडळाचे सुजाण कार्यकर्ते अशी त्यांची प्रतिमा कायम राहिली असती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT