Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विश्लेषण

Paschim Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राचा ‘दादा’ कोण?

सरकारनामा ब्यूरो

Paschim Maharashtra News : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. यातील निम्म्या म्हणजे 27 जागा या पश्चिम महाराष्ट्रातून मिळाल्या आहेत.

साहजिकच यावेळीही पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. मात्र, ही लढत ‘महाविकास आघाडी विरुद्ध महायुती'' अशी न होता, ‘पवार विरुद्ध पवार'' अशीच होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार हे प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा निवडणुकीत अखेरपर्यंत झालेला जागावाटपाचा घोळ, मतदारसंघ आणि उमेदवारीची अदलाबदल याचा जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यातून धडा शिकत विधानसभेला अशा चुका टाळण्यासाठीच पहिल्यापासूनच कणखर भूमिका घेण्यास अजित पवार यांनी सुरुवात केली आहे.

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' अजित पवार यांच्या महिला बालकल्याण विभागाने आणली. मात्र, योजनेत केवळ मुख्यमंत्र्यांचा ''गवगवा'' होऊ लागल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री लाडकी बहीणऐवजी केवळ ''माझी लाडकी बहीण'' असा प्रचार करत, एक प्रकारे महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इशाराच दिला.

अजितच पवारांचे मित्रपक्षांना आव्हान!

आघाडी, युतीच्या राजकारणात जागावाटपावर एकमत झाल्यानंतर सर्वसंमतीने उमेदवारीची घोषणा अपेक्षित असते. मात्र, अजित पवार यांनी ‘इंदापूर’ या महायुतीतील नाजूक जागेपासून उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

‘लाडकी बहीण''च्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, तर इंदापूर येथून दत्तात्रय भरणे मामा यांची उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पक्षाला अजित पवार यांनी एक प्रकारे आव्हानच दिले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आपण ''धक्क्याला'' लागणार नाही, म्हणजे आपली ससेहोलपट होणार नाही, याची मात्र खात्री पटली आहे. नाही तर लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी पक्षप्रवेश केला, यातील अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी गमवावी लागली.

तर काहींना अर्ज भरेपर्यंत उमेदवारीसाठी झगडावे लागले. त्यामुळे अशी परिस्थिती अजित पवार हे आपल्या पक्षाच्या आमदारांवर येऊ देणार नाहीत, याची खात्री संबंधितांना आता पटली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यमान जागांसह आणखी काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार आग्रही भूमिका घेतील, असे सध्याचे चित्र आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील यश

पश्चिम महाराष्ट्र हा समृद्ध सहकाराचे आगार आहे. येथून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले, तर सत्तेपर्यंत जाता येते याबद्दल दोन्ही पवारांना विश्वास आहे. मात्र जबरदस्ती करून हाताला काही लागत नाही असाही अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रात सेवा संस्था, दूध संस्था, पतसंस्था, सहकारी बँका, जिल्हा बँक, दूध संघ, बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघ आणि साखर कारखाने या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची तळागाळापर्यंत नाळ जोडली गेली आहे. यातही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीवर आहे.

अनेक साखर कारखानदार निवडणुका पाहून भूमिका बदलताना आपण पाहिले आहे. जे कारखानदार विरोधात जातात त्यांना सत्ताधारी पक्षाकडून त्रास दिला जातो याचे ताजे उदाहरण लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. कोपरगावच्या शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना, तसेच संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला कर्ज नाकारण्यात आले. वास्तविक साखर कारखाना ही कोणा एकाची जहागिरदारी नाही. हजारो सभासदांच्या मालकीचे हे कारखाने आहेत. असे असताना राजकीय द्वेषातून कर्ज नाकारण्यात आले. याचा निवडणुकीत जो परिणाम व्हायचा तो झालाच. कर्ज नाकारल्याने निकालात काही फरक पडला नाही, हा भाग वेगळा.

सत्तेशिवाय पर्याय नाही...

राज्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे सहकाराचे राजकारण कशा पद्धतीने चालते त्याचे उदाहरण म्हणून वरील दोन्ही कारखान्यांकडे पाहता येईल. सहकारात ''आडवा आणि जिरवा'' नीती पदोपदी पाहायला मिळते. या सहकारी संस्था टिकवायच्या असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही हे सर्वमान्य आहे. भारतीय जनता पक्षानेही सत्तेच्या जोरावर सहकारात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. ‘राष्ट्रवादी‘तील फुटीनंतर अजित पवार यांच्या माध्यमातून सहकारावर व पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत भाजप, अजित पवार आणि महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही.

पश्चिम महाराष्ट्राचा मतदार हुशार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जो निकाल लागला त्याचीच पुनरावृत्ती होईल, याची खात्री कोणालाही देता येत नाही. परिणामी लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता अजित पवार यांनी नेटाने प्रचार सुरू केला आहे. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. सहकाराच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही पवार सज्ज झाले आहेत, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राचा ''दादा'' कोण, हे ठरणार आहे.

सर्वकाही सत्तेसाठी...

 सहकार बालेकिल्ल्यावर वर्चस्वासाठी दोन्ही पवार सिद्ध

 शरद पवारांच्या दौऱ्यानंतर अजित पवारांकडून उमेदवार यादी

 अजित पवार महायुतीत आपल्या आमदारांसाठी आग्रही

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - 9881598815

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT