Ashok Pawar-Rishiraj Pawar Sarkarnama
विश्लेषण

पवारांची तिसरी पिढी ‘घोडगंगा’च्या राजकारणात : चिरंजीवासह आमदार अशोक पवार प्रथमच संचालक मंडळात

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पॅनेलने पाचव्यांदा विजय मिळविला आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे अशोक पवार आणि त्यांचे चिरंजीव ऋषिराज पवार (Rishiraj Pawar) हे पिता-पुत्र प्रथमच संचालक मंडळात दिसणार आहेत. विशेष म्हणजे ऋषिराज पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. (Pawar father and son for the first time in the board of directors of Ghodganga Sugar Factory)

आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलने सरासरी दीड हजाराच्या मताधिक्क्याने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आहे. आमदार पवार हे वडगाव रासाई गटातून तब्बल अडीच हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. आमदार ॲड. अशोक पवार यांनी सन १९९७ पासून झालेल्या कारखान्याच्या सर्व निवडणुकांत वर्चस्व राखले असून, मताधिक्क्य वेळोवेळी वाढवत नेल्याचेही कालच्या निकालातून दिसून आले आहे. यापूर्वीचा एक अपवाद वगळता सर्वाधिक मते मिळविण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

आमदार ॲड. अशोक पवार हे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे पूत्र ऋषिराज पवार यांची यापूर्वीच कारखान्याच्या ब वर्ग मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहे. आमदार पवार हे, घोडगंगा कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार (स्व.) रावसाहेबदादा पवार यांचे पुत्र असून, बिनविरोध निवड झालेले ऋषिराज हे त्यांचे नातू आहेत. ऋषिराज यांच्या रूपाने रावसाहेबदादा पवार यांची तिसरी पिढी कारखान्याच्या कारभारात सक्रिय झाली आहे. अशोक पवार व ऋषिराज पवार हे पिता-पुत्र प्रथमच एकत्रितपणे कारखान्याचा कारभार पाहणार आहेत. कारखान्याच्या इतिहासात पिता-पुत्राची एकाच वेळी संचालक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या ना त्या कारणाने गेले वर्षभरापासून गाजत होती. सुरवातीला ३१ जुलैला जाहिर झालेली ही निवडणूक राज्य सरकारने अतिवृष्टीच्या कारणास्तव स्थगित केली. तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन ११० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, अर्ज दाखल केलेल्यांमध्ये माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचाही समावेश होता व त्यांचा अर्ज वैधही ठरला होता. स्थगितीदरम्यान, ११ ऑगस्टला त्यांचे आजारपणामुळे निधन झाल्याने या निवडणूकीची प्रक्रिया पहिल्यापासून राबवावी, अशी मागणी विरोधी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलने केली होती व सहकार खात्याने त्यास संमती दिली होती. त्यावर काही सभासदांनी आक्षेप नोंदवून थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर स्थगिती उठली व ज्या टप्प्यावर निवडणूक थांबली तेथून पुढे प्रक्रिया राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ही निवडणूक सहा ऑक्टोबरला होऊन काल सात ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले. या निवडणूकीचे सुरवातीपासून ते काल निकाल, रिकाऊंटींगनंतरचे निकाल या सर्व बारीक सारीक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेले शिरूरचे सहायक निबंधक शंकर कुंभार यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.

कालच्या मतमोजणीसाठी नगर जिल्ह्यातील सहाशे कर्मचारी नियुक्त केले होते. ही निवडणूक चुरशीची होती, ताणतणावाचे प्रसंग उद्भवले परंतू आम्ही पोलिसांच्या मदतीने सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याचे दिग्विजय आहेर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचे अमूल्य सहकार्य व टीम वर्कमुळे ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता आल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT