Devendra Fadnavis-Ashish Shelar
Devendra Fadnavis-Ashish Shelar Sarkarnama
विश्लेषण

अंधेरीच्या माघारीतून फडणवीसांचा आशिष शेलारांवर नेम?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व पोटनिवडणुकीतून (By Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) माघार घेत एकाच दगडात अनेक पक्षांना घायाळ केले आहे. माघारीसाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये आपला शब्द अंतिम राहणार हे पुन्हा दाखवून दिले आहे. शिवाय, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनाही त्यांनी दुसऱ्यांदा धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे. (Politics took place in BJP over withdrawal from Andheri by-election)

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोधची चर्चा सुरू झाली. त्यावर फडणवीस यांनी सावध भूमिका घेत ‘मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही’ असे सांगून हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टातून येईल, असे स्पष्ट केले. या सर्व घडामोडी रविवारी घडल्या आणि आज (ता. १७ ऑक्टोबर) केंद्रातून भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी सकाळीच मुंबईत पोचले. मुंबईत येताच ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. खरंतर त्याच ठिकाणी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा मुंबईत जोरात सुरू झाली होती.

अंधेरीतून माघार घेण्यावरून खुद्द भाजपमध्येच दोन मतप्रवाह होते, असे आज दिसून आले. विशेषतः मुरजी पटेल यांच्या उमेदवारीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. उमेदवारी दिल्लीहून घोषित झाली असली तरी त्यामागे शेलार यांचे वजन होते. त्यामुळेच आशिष शेलार आणि पटेल यांचा गट हा अंधेरी पोटनिवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते. पण, फडणवीस आणि भाजपतील इतर नेते मात्र सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेचा दाखल देत माघारीसाठी तयारी दाखवत होते. फडणवीस यांना भेटलेले राष्ट्रीय सचिव रवी यांनी शेलार यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांना पक्षाची भूमिका सांगत माघारीबाबत समजूत घातली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माघारीची घोषणा तीही नागपुरातून केली. त्यामुळे भाजपने घेतलेली माघार हे सहजासहजी आणि सोपी नव्हती.

खरं तर फडणवीसांनी शेलार यांना दुसऱ्यांदा अशा प्रकारे धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर असलेली युती तोडून मुंबई महापालिकेची मागील निवडणूक स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यावेळीही शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने म्हणजेच ८४ जागा जिंकल्या होत्या. महापौरपदी भाजपचा नगरसेवक बसणार, असे वातावरण त्यावेळी होते. मात्र, राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दुखावण्यास तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तयार नव्हते. त्यामुळे भाजपचा महापौर करण्याची पूर्ण तयारी (फोडाफोडी) झालेली असतानाही ऐनवेळी महापौरपद शिवसेनेला सोडून देण्यात आले.

आताही शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. पटेल यांची उमेदवारी आणि अंधेरी पोटनिवडणूक लढविण्यासाठी शेलार यांचाच आग्रह होता. महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकत त्यांनी हायकमांडच्या गुडबूकमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच या पाेटनिवडणुकीची सर्व जबाबदारी शेलार यांच्यावर होती. ही निवडणूक जिंकली असती तर शेलार यांची ताकद केंद्रात नक्कीच वाढली असती. शिवाय फडणवीस यांना भाविष्यात आणखी स्पर्धक निर्माण झाला असता, त्यातूनच ही निवडणूक बिनविरोध करत फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत, असा होरा राजकीय वर्तुळातून लावला जात आहे. योगायोग म्हणा की काही मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही फडणवीस हजर नव्हते, हे मात्र विशेष.

ठाकरेंना सहानुभूती मिळू नये, याची काळजी

दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक राजकारणाला पायबंद घालणे, शिवसेनेचा अंधेरीत विजय झाला त्याचा फायदा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो, तो होऊ नये. तसेच, मराठी मतदारांची सहानुभूती ठाकरे यांना मिळू नये, याचा दक्षता घेण्यात आली आहे, असा दावा फडणवीस समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT