Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Sarkarnama
विश्लेषण

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची यात्रा 'या' पाच जिल्ह्यातून जाण्याचे काय आहेत राजकीय अर्थ...

अमोल जायभाये

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा १६ दिवस महाराष्ट्रात असणार आहे. मराठवाड्यातून प्रवेश करुन विदर्भमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून यात्रा जाणार आहे.

मात्र, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेसाठी महाराष्ट्रातील याच पाच जिल्ह्याचा मार्ग का निवडला? या पाच जिल्ह्यातून ही यात्रा का जाते आहे? कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करायचा होता, तर सोलापूर जिल्ह्यातुनही करता आला असता. मात्र, राहुल गांधी यांनी नांदेडची निवड केली. या मागे राजकीय समीकरणं मोठे आहे.

या यात्रेत दक्षिणेतील राज्य तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्य आहेत. भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) मार्ग पाहिला तर तेथे अजुनही काँग्रेसची (Congress) चांगली ताकद आहे. तेच राज्य या यात्रेसाठी निवडण्यात आले आहे. यात्रा राजकीय नाही, असे काँग्रेस नेते सांगत असले तरी २०२४ च्या लोकसभेची तयारी साठीच यात्रा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील यात्रेचे राजकीय महत्व मोठे आहे. मराठवाडा आणि विदर्भाची निवड यामागे मोठे राजकीय गणित आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जात आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. ते आणखी मजबूत करणे आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भातून अधीक खासदार पदरात पाडून घेण्याची रणनिती आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण जागा ४८ आहेत. त्यामध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार हा विदर्भातील आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला तर २०१९ मध्ये २८८ पैकी ४४ जागा काँग्रेसने जिंकलेल्या. त्यात २३ आमदार हे राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा ज्या दोन प्रदेशातून म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातून जात आहे, त्यातील आहेत. यात विदर्भातील १५ आणि मराठवाड्यातल्या ८ आमदारांचा समावेश आहे.

एकीकडे काँग्रेस संपली असा दावा करण्यात येत असला तरी या दोन विभागात काँग्रेसचा मोठा मतदार आहे. हे खरे असले तरी या दोन्ही विभागात काँग्रेस काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. २००९ ला या दोन्ही विभागातून काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले होते. २०१४ च्या मोदी लाटेतही काँग्रेसला मराठवाड्याने अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांच्या रुपाने दोन खासदार दिले होते. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांचा पराभव झाला. त्यामुळे इथे काँग्रेसला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी नांदेडमध्ये सभा घेण्याचे ठरवले, असे सांगितले जाते.

ही यात्रा नांदेडनंतर, हिंगोली जिल्ह्यात जाणार आहे. हिंगोलीतही काँग्रेसला मोठी संधी आहे. राजीव सातव हिंगोलीतून २०१४ ला खासदार झाले होते. तसेच मराठवाड्यातील लातुर जिल्हाही काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मराठवाड्यातून राहुल गांधी यांची यात्रा जाणार असल्याने लातुरला देखली त्याचा फायदा होऊ शकतो.

मराठवाड्यातून ही यात्रा विदर्भात जाणार आहे. विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भात काँग्रेसचा प्रभाव जास्त राहिलेला आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून विदर्भाने पक्षाला पाठिंबा दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला बाळू धानोरकर यांच्या रुपाने एक खासदार मिळाला. विदर्भातून काँग्रेसचे १५ आमदार आहेत. येथे काँग्रेसला थोडेसे जरी बळ मिळाले तरी महाराष्ट्रात पक्षाला चांगले दिवस येथील.

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने चमत्कार घडवला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), सुनील केदार, मानीकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकुर, नितीन राऊत, खासदार बाळु धानोरकर अशा मोठ्या नेत्यांची फौज आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काँग्रेसचे वर्चस्व राखले आहे. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, विदर्भातून तब्बल ६२ आमदार विधानसभेवर निवडून जातात. मात्र, आता काँग्रेसची ही ताकद कमी होताना दिसत आहे. त्यामुळे येथे पक्षाला उभारी देण्याची गरज आहे. त्यामुळे विदर्भातील या जिल्ह्यांचा विचार झाल्याचे दिसते.

राहुल गांधींची यात्रा मराठवाडा आणि विदर्भातून जात आहे, या प्रदेशांनी काँग्रेसला साथ दिली आहे. इथे अजूनही काँग्रेसची पकड मजबूत आहे. ती अधिक मजबूत करण्यासाचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसचे बालेकिल्ले परत मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यात्रेला सध्यातरी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र, याचे निवडणुकीत काय परिनाम झाले ते लोकसभा आणि विधानसभेलाच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT