Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray News : भाजपचे पापक्षालन, ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना परत ?

Sachin Deshpande

Maharashtra Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत 'मी पुन्हा येईल' हे सांगताना मी दोन पक्ष फोडले याची कबुली दिली होती. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुरत मार्गे गुवाहटी आणि शिवसेनेतील फूट याला फडणवीस यांचा हातभार होता, हे स्पष्ट करणारे ते विधान होते. त्यानंतर महाराष्ट्रात 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील....' आणि 'पन्नास खोके एकदम ओके....', 'गद्दार, मिंधे सरकार' असे नवे वाक्य रोज कानावर पडत आहे. शिवसेनेच्या या फुटीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील फूट पडली. मी पुन्हा येईलचे उत्तर देताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या फुटीची जबाबदारी स्वीकारली होती.

महाराष्ट्रात हिंदू मतांची जुळवा-जुळव करताना भाजपला नेहमी शिवसेनेची मदत झाली आहे. यंदा भाजपला मात्र घाम फुटत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा हा भाजपच्या मदतीला अनेकदा धावला. भगव्या छाप्या, दुप्पटे आणि कट्टर शिवसैनिक यांनीदेखील भाजपचा निष्ठेने प्रचार केला. म्हणूनच गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला राज्यात मोठे यश प्राप्त झाले.

महाराष्ट्रात भाजपला 23 जागांवर विजय प्राप्त करता आला सोबत 18 जागांवर शिवसेना विजयी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर, तर काँग्रेस एका जागेवर स्थिरावली. अशा परिस्थितीत मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार, त्यानंतर शिवसेनेतील फूट, त्याचबरोबर राष्ट्रवादीची फूट अशा सर्व परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुका होत आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीप्रमाणे 23 पेक्षा अधिक जागांवर विजय संपादित करायचा आहे. त्याचबरोबर सोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे 15 जागांवर विजय प्राप्त करावा, यासाठीची ही व्यूहरचना आखली जात आहे. (Raj Thackeray Politcal News )

महाराष्ट्रात शिवसेना फुटीचा लोकसभा निवडणुकीत मोठा फरक मतदारसंघनिहाय पडला तर राज्यातील 45 पार आणि देशातील 400 पारचा आकडा स्वप्नवत ठरू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रचार आणि प्रसारास राज ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार, विकासात्मक ब्लू प्रिंट आणि मोदींचे नेतृत्व यावर फोकस करत भाजप प्रचाराचे गणित निश्चित करत आहे. हे सर्व करताना ठाकरेंची शिवसेना फोडल्याचे पाप डोक्यावरून कमी करण्यासाठी आणि शिवसेनेच्या मतदारांना पुन्हा एकदा ठाकरे नावाच्या वलयाकडे वळविण्यासाठी, झुकविण्यासाठी राजकीय धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.

याचा सर्वाधिक फायदा हा मुंबई, ठाणे आणि कोकण या पट्ट्यात होणार असल्याने त्यावर आधारीत प्रचाराची रणनीती भाजपची असावी. त्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेना पक्षाचे नेतृत्व करण्याच्या पायघड्या भाजपने घातल्या आहेत. मुळात भाजप शिवसेना अंतर्गत निर्णय कधीपासून घ्यायला लागले ?, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण, तो प्रश्न महाशक्तीसमोर निरर्थक आणि चुकीचा आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आणि त्यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार उभा करण्याचा संकेत दिला. यामुळे राज्यात मतांच्या विभाजनाची दाट शक्यता आहे. अद्याप राज्यात वंचितने महाविकास आघाडीचा हात सोडला नाही आणि पूर्णतः पकडलादेखील नाही. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन टाळण्याकडे लक्ष दिले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विविध मतदारसंघांत नुसतेच भाषण नाही तर धडाकेबाज भाषण जे मतं परिवर्तित करतील. या मुख्य उद्देशाने राज ठाकरे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची भाषणशैली ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव पाडण्यास पुरेशी नाही. अशा वेळी हिंदुत्वाचा कट्टर चेहरा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे परिवारातील नेता, भाजपसाठी महत्त्वाचा आहे. त्यातूनच 'लोहे को लोहा काटता है....' अर्थात ठाकरे यांना ठाकरेंच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.

राज ठाकरे यांना शिवसेना सोपवून आणि लोकसभा निवडणुकीच्या अपेक्षित यशानंतर काही महिन्यांसाठी राज ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले, तर महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटू नये, अशीच काय ती स्थिती राज्यात आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या माध्यमातून भाजपने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचे पापक्षालन सुरू केल्याचे चित्र आहे. ठाकरेंची शिवसेना फोडून ठाकरेंच्या हातात दिली, असा दावा करण्यासही भाजप नेते मागे पुढे पाहणार नाहीत.

राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणशैलीचा आणि राजकीय इमेजचा फायदा भाजप घेण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतदेखील त्याचा वापर करता येईल, इतकी दूरदृष्टी भाजप नेतृत्वाची नक्कीच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबर राज्यातील मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

काही बाबतीत 'गरज सरो वैद्य....' ही भाजपची भूमिका आतापर्यंत राहिली आहे. ती पुढे ही कायम राहील. तूर्तास लोकसभा निवडणूक त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीतदेखील मनसे नेते राज ठाकरे हे केवळ महायुतीच्या नाही तर भाजपच्या नक्कीच पथ्यावर पडतील.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताब्यात शिवसेना देण्याच्या प्रयत्नात भाजप नेते यशस्वी झाले, तर भाजपचे काही बोलघेवडे नेते काही वर्षांनी असा पण दावा करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्या दाव्यात ते 'आम्ही शिवसेनेचे काँग्रेसीकरण होऊ दिले नाही आणि आम्ही तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते की, राज ठाकरे यांच्या हातात शिवसेना देऊ, ते वचन आम्ही पूर्ण केले,' असा दावा भाजप नेत्यांनी काही वर्षांनी केला, तर आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती किमान आज तरी आहे.

आता फक्त मनसे नेते राज ठाकरे यांच्या होकाराची प्रतीक्षा आहे. तूर्तास ठाकरेंची शिवसेना (Shivsena) फोडल्याचे पाप डोक्यावरून झटकण्यासाठी आणि त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्यासोबत आहे, अशा दाव्याची भाजपची (Bjp) स्क्रिप्टची तयार झाली असावी.

(Edited By : Sachin Wghamare)

R

SCROLL FOR NEXT