Archana Patil Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv Lok Sabha Constituency : जनसंघ, भाजपच्या संस्थापकांची नात लढवणार धाराशिवचा किल्ला; दीर-भावजयमध्ये चुरस

अय्यूब कादरी

Dharashiv Political News : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पक्ष, उमेदवार बदलला तरी लढत मात्र पाटील आणि राजेनिंबाळकर या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धींमधेच होणार आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार, राज्याचे माजी मंत्री उत्तमराव पाटील ऊर्फ नानासाहेब Uttamrao Patil यांची नात अर्चनाताई पाटील यांना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने NCP उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आहेत. उमेदवार बदलला असला तरी 2019 प्रमाणे या मतदारसंघात पारंपरिक कट्टर राजकीय विरोधकांमध्येच लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

पाटील आणि राजेनिंबाळकर घराणे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. राणाजगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर Omprakash RajeNimbalkar हे चुलतबंधू आहेत. राजकीय मतभेदांनंतर ओमराजे यांचे वडील दिवंगत पवन राजेनिंबाळकर हे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यापासून वेगळे झाले. त्यांनी 2004 मध्ये डॉ. पाटील यांच्याविरोधात उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात डॉ. पाटील यांचा निसटता विजय झाला होता. 3 जून 2006 रोजी मुंबईहून कारमध्ये परत येताना कळंबोली येथे पवन राजेनिंबाळकर यांचा खून झाला. त्यावेळेसपासून दोन्ही कुटंबीयांत वैर वाढले आहे. या प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

उस्मानाबाद मतदारसंघ Dharashiv महायुतीत कोणत्या पक्षाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज एक नवीन नाव समोर येत होते. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव भाजपकडून सर्वाधिक चर्चेत होते. हा मतदारसंघ आपल्याला सुटावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जोर लावला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला, मात्र उमेदवारी अर्चनाताई यांना मिळाली. शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत जोर लावला होता. पालकमंत्री तानाजी सावंत हेही पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी आग्रही होते.

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राणाजगजितसिंह पाटील Ranajagjeetsingh Patil यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राजेनिंबाळकर यांना पाच लाख 91 हजार 605 तर राणाजगजितसिंह पाटील यांना चार लाख 64 हजार 747 मते मिळाली होती. पाटील यांचा एक 26 हजार 858 मतांनी पराभव झाला होता. या पराभवानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकीटावर तुळजापूर मतदारसंघातून लढवली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करून ते विजयी झाले होते. अर्चनाताई पाटील याही राजकारणात सक्रिय आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारात त्या सक्रिय होत्या. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तेर गटातून त्या सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होऊन त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संपर्क वाढवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्चना पाटील Archana Patil यांचे माहेर नाशिक जिल्ह्यातील निवाणे (ता. कळमण) आहे. त्यांचे वडील अशोकराव आहेर हे टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर होते. अर्चनाताई यांचे आजोळ जळगाव जिल्ह्यातील (वाघळी, ता. चाळीसगाव) असून, ते राजकारणाशी संबंधित आहे. त्यांचे आजोबा उत्तमराव पाटील ऊर्फ नानासाहेब हे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. उत्तमराव पाटील हे जनसंघाचे राज्यातील पहिले खासदार. 1957 मध्ये ते धुळे मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी ते आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे दोघेच निवडून आले होते.

भाजपच्या स्थापनेतही उत्तमराव पाटील यांची महत्वाची भूमिका होती. 1989 मध्ये उत्तमराव पाटील हे एरंडोल मतदारसंघातून पुन्हा खासदार झाले. 1978 मध्ये ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर 1978 ते 1980 पर्यंत ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री होते. 1980 ते 1986 या काळात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते. 18 नोव्हेंबर 2001 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

अर्चनाताई यांचा विवाह राज्यातील दिग्गज राजकीय घराण्यात झाला. अर्चनाताई यांचे पती राणाजगजितसिंह पाटील हे आता भाजपचे आमदार असून, ते यापूर्वी आघाडी सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. त्यांचे सासरे डॉ. पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री, दिग्गज नेते आहेत. अर्चनाताई या अभियांत्रिकीच्या (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर आहेत. अभियांत्रिकीत त्या गुणवत्ताधारक आहेत. दहावीलाही त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांचे शिक्षण नाशिक, पुणे आणि मुंबई येथे झाले आहे.

धाराशिव येथे लेडिज क्लबच्या माध्यमातून त्या समाजकारणात सक्रिय होत्या. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी लेडिज क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटन केले. आता त्या लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उस्मानाबाद लोकसभेचा विस्तार लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातही आहे. प्रचंड मोठ्या अशा या मतदारसंघात त्यांना पती राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या सक्षम यंत्रणेची साथ मिळणार आहे. याच बळावर 2019 च्या निवडणुकीत झालेल्या आपल्या पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी अर्चनाताई यांना उपलब्ध झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT