Mamata Banerjee Sarkarnama
विश्लेषण

Mamata Banerjee : ममतादीदींचे 'हे' रूप 13 वर्षांत पहिल्यांदाच पाहिले; कधीच नव्हती अशी भाषा...

Rajanand More

Kolkata : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची आक्रमक नेत्या अशी ओळख आहे. मागील 13 वर्षांत त्यांनी भाजपसह काँगेस आणि डाव्या पक्षांना जोरदार टक्कर दिली. त्या कधीही हतबल दिल्या नाहीत. पण गुरूवारी (ता. 12) त्यांचे वेगळेच रुप सगळ्यांना पाहायला मिळाले. ममतादीदी हताश, भावनिक दिसल्या. एवढेच नाही तर हात जोडून लोकांची माफी मागितली अन् राजीनाम्याची भाषाही बोलू लागल्या.

लोकांसाठी आपण राजीनामा द्यायलाही तयार असल्याचे विधान गुरूवारी ममता बॅनर्जी यांनी केले. तृणमूल काँगेसमधील नेत्यांसाठीही कदाचित हा धक्का असावा. पण संतापाची लाट कमी करण्यासाठी ममतांची ही राजकीय खेळीही असू शकते, असाही कयास लावला जात आहे. असे असले मागील 13 वर्षांत पहिल्यांदाच हात जोडून माफी मागण्याची वेळ ममतांवर आली, हे राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानले जात आहे.

आरजी कार रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जवळपास महिन्याहून अधिक काळापासून बंगाल धूमसत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातही त्याचे पडसाद उमटले. भाजपसह सर्वच पक्षांनी ममतांना घेरले आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात असून राजीनाम्याची मागणीही होत आहे. त्यातच ट्रेनी डॉक्टर आंदोलन करत असून कामावर परत येण्यास तयार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांनी माघार घेतली नाही.

ममतांनी गुरूवारी या डॉक्टरांना विधानभवनात चर्चेसाठी बोलावले होते. ते चर्चेत सहभागी न होताच माघारी फिरले. त्यानंतर ममतांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना त्या म्हणाल्या, मी बंगालच्या नागरिकांची माफी मागते. आज आरजी करमधील अडचणी दूर होतील, असे वाटले होते. ते विधानभवनात आले, पण बैठकीत सहभागी झाले नाहीत. त्यांनी कामावर यावे, अशी विनंती करते.

मी लोकांसाठी राजीनामा द्यायलाही तयार आहे. कारण मागील तीन दिवसांत माझ्या अनेक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांनी चर्चेला नकार दिला. मला सीएमची खुर्ची नको, पीडितेला न्याय हवा आहे, असे ममतांनी सांगितले होते.

का बदलले ममतांचे रुप?

रुग्णालयातील घटनेनंतर ममतांचे रुप बदलल्याची चर्चा आहे. सत्तेत असताना एवढा दबाव त्यांच्यावर कधीच नव्हता. लोकांच्या रोषाबरोबरच त्यांना पक्षातील मतभेदांचा सामनाही करावा लागत आहे. लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. पक्षातील काही नेते उघडपणे विरोधात बोलत आहेत. राज्यसभेच्या एका खासदारांनी राजीनामाही दिला आहे.

सामाजिक संघटनांकडूनही सातत्याने या प्रकरणावर आवाज उठवला जात आहे. राज्यातील विरोधी राजकीय पक्षांनीही त्यांना घेरले आहे. परिणामी, 13 वर्षांत त्या पहिल्यांदाच हतबल झाल्याचे गुरूवारी दिसले. 

भावनिक दबाव

ममतांच्या बदललेल्या रुपामागे राजकारण असल्याची टीकाही होत आहे. केवळ स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी, त्या भावनिक दबावतंत्राचा वापर करत असल्याची चर्चा आहे. राजकारणातील मोजक्या कणखर महिलांमध्ये ममतांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्या सहजासहजी राजीनामा देणार नाहीत.

राज्यातील तापलेले वातावरण शांत करण्यासाठी त्यांनी हा टाकलेला डाव असू शकतो. कारण त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येतील, पक्षफुटीचाही धोका आहे. याचा थेट फायदा विरोधकांनाच होणार आहे. त्यामुळे ममतांची राजीनाम्याची भाषा राजकीय आहे की भावनिक हे लवकरच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT