<div class="paragraphs"><p>MP Sunil Tatkare and Aditi Tatkare </p></div>

MP Sunil Tatkare and Aditi Tatkare

 

Sarkarnama 

विश्लेषण

सुनील तटकरेंमुळे महाविकास आघाडीला तडे? : सलग तीन सेना आमदारांची टीका

Yogesh Kute

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविषयी शिवसेना नेत्यांमधील नाराजी वाढत चालली आहे. तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज केला. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोघांनंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांनीही तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुणबी भवनाचे निमित्त करून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप कदम यांनी आज केला. अशाच प्रकरचा आरोप गुहागरचे आमदार जाधव यांनी केला होता. तटकरे हे माझ्यामुळे खासदार झाल्याचा दावा जाधव यांनी केला होता. तसेच तटकरे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी स्वतःच्या कुटुंबाऐवजी एखाद्या कुणबी कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी केली होती. शेकापचे नेते जयंत पाटील आणि तटकरे यांचेही सध्या फारसे सख्य नसल्याचे दर्शविणारी विधान पाटील यांनी नुकतीच केली होती. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना रायगडमधील शासकीय कमिट्यांच्या नियुक्त्यांवरून वाद झाला होता. तेव्हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला होता. आता या साऱ्यांत दळवी यांचीही भर पडली आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी पाली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तटकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. तटकरे यांनी स्वतःच्या कुटुंबाचाच फक्त विकास केला, असे सांगत त्यांनी वैयक्तिक टीका केली आहे. तटकरे यांना स्वतःच्या कुटुंबाशिवाय दुसरे काही सुचत नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, असे व्यक्तव्य दळवी यांनी पाली नगरपंचायत निवडणूक प्रचार सभेत केले. मी त्याच्यासोबत काम केले असून तटकरे यांना जवळून ओळखत असल्याचे दळवी यांनी म्हटले आहे.

एके काळी तटकरे यांचे कार्ड चालायचे पण आता ते बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेकाप यांना एकत्र यावे लागले हीच त्यांची हार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी सोबत मंत्री व नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली मात्र त्यातून काही निघाले नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वार्थच दिसत होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने `एकला चलो`ची भूमिका घेतली, असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.

पाली नगरपंचायत ही नव्याने निर्माण झाली असून पहिलीच निवडणूक होत आहे. पाली नगरपंचायत आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राजकीय पक्षानी कंबर कसली आहे. पाली नगरपंचायत शिवसेना ही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी, शेकाप याची आघाडी असून भाजपही स्वबळावर लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT