Uddhav Thackerey & Prakash Ambedkar
Uddhav Thackerey & Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Shivshakti Bhimshakti : 'शिवशक्ती-भीमशक्ती' ची चर्चा सकारात्मकतेच्या पुढे जाणार का ?

Mangesh Mahale

Prakash Ambedkar : शिवसेना-वंचित विकास आघाडी एकत्र येण्याच्या सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मन वळविण्यात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) यश आले असले तरी निवडणुकीत वंचितला किती जागा लढण्याची संधी मिळेल, यावर आघाडीची चर्चा पुढे जाईल, अन्यथा ही चर्चा सकारात्मक चर्चेच्या पुढे जाऊ शकणार नाही. (shivshakti bhimshakti latest news)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे ठाकरे यांनी जरी सांगितले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यात जागा वाटपावरुन खोडा घालणार का ? या दोन्ही पक्षासोबत आघाडी कशी असेल, जागा वाटपाचा तिढा सुटेल का ? यानंतरच खऱ्या अर्थांने सकारात्मक चर्चांना यश आले, असे म्हणता येईल.

आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'बाबत केलेले वक्तव्य आणि पवार कुटुंबियांबाबत प्रतिकुल असलेली त्यांची मते या पार्श्वभूमीवर ही आघाडी होणार की नाही, हे येत्या काही दिवसात समजेल.

दोन्ही राजकीय पक्ष नव्या मित्राच्या शोधात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत वंचित आघाडीला ‘एमआयएम’ सोबत तोडलेल्या युतीनंतर म्हणावं तसं राजकीय यश मिळालेलं नाही. 'शिवशक्ती-भीमशक्ती'हा प्रयोग नव्वदच्या दशकात झाला होता, त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यालाही फारसे यश मिळालं नव्हतं.

सध्या कट्टर हिंदुत्व सोडल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेशी प्रकाश आंबेडकर सहमत आहेत. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य आहे.पण आंबेडकरांना मानणाऱ्या संघटनेतील कार्यकर्त्यांना, दलित जनतेला हे मान्य होईल, का प्रश्न आहे.

प्रकाश आंबेडकरांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रस्ताव दिला होता, दोन्ही पक्षांनी तो नाकारला. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आंबेडकांशी संवाद न साधल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आंबेडकरांनी ‘एमआयएम’शी युती केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मतविभाजनामुळे काही मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते.

केवळ उद्धव ठाकरेंच्या आग्रहास्तव वंचितला आघाडीत घेण्यास दोन्ही पक्ष तयार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘वंचित'ची युती फक्त शिवसेनेशी असेल की आघाडीशी’ हा प्रकाश आंबेडकरांचा मूळ प्रश्न होता.तो प्रश्न आता सुटला आहे, कारण आघाडीच्या दोन्ही काँग्रेसकडून त्याला सकारात्मकता दाखवली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेसोबत युती, आणि महाविकास आघाडीत चौथा घटक होण्याची आंबेडकरांची तयारी आहे.

कुठलेही दोन राजकीय पक्ष एकत्र येत असतानाच फक्त चर्चा करुन भागत नाही, तर कोण किती जागा लढणार, कुठल्या जागा मिळणार, याबाबत स्पष्ट निर्णय होणे गरजेचे आहे. जागावाटपावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता नाही

मुळात शिवसेना हा आता फुटलेला पक्ष आहे. निवडून आलेले बहुतांश आमदार शिंदे गटात गेलेले आहेत. शिवसेनेला स्वत:ला आता पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे. शिवसेना संघटना म्हणूनही किती सक्रिय आहे, हे आता शिवसेनेचा दाखवणे गरजेचे आहे. दुसरीकडे युती झाली नाही, तरीही वंचित आघाडीने त्यांच्या संघटना पातळीवरील मेळावे सुरु केले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आगामी निवडणुकीत संघटनात्मक पातळीवर ठाकरेंना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी 'वंचित'चा आधार घ्यावा लागेल, तर दुसरीकडे आंबेडकरांनी यापू्र्वी केलेल्या अन्य पक्षाची युतीनंतर त्यांना मिळालेले यश, भीमशक्तीला सामाजिकदृष्ट्या किती फायदा झाला, याचा विचार आंबेडकरांना नक्की करावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT