Sindhudurg News : शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेल्या दाव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आली आहे. शिवाय भाजपच्या जिल्हाध्यक्षासह सरचिटणीस यांनी शिवसेनेला इशारा देताना, आधी माफी मागा मगच महायुतीबाबत चर्चा होईल, असे ठणकावले आहे.
नुकताच शिवसेनेकडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित होते. यावेळी गोगावले म्हणाले, राणेंनी अंगावर केसेस घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या प्रसंगी जेलमध्ये गेले, भानगडी केल्या. ते असेच मोठे झालेले नाहीत, असे वादग्रस्त विधान केलं होते. तर वाद चिघळल्यानंतर आता त्यांनी थेट यू-टर्न घेतला आहे. त्यांनी, आपण नारायण राणेंबद्दल चुकून ते वक्तव्य केल्याचं म्हटलं आहे. आपल्या बोलण्याचा तसा उद्देश नव्हता.
यानंतर आता सिंधुदर्ग जिल्ह्यासह राज्यातील राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी देखील यावरून तिखट नाही पण खोचक प्रतिक्रिया देत गोगावलेंना चहाचे आमंत्रण दिले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल असा टोला लगावला आहे. भाजप नेते आणि मंत्र्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर शिवसेनेच्या विविध नेत्यांची यावर सावरासवार केली आहे.
पण गोगावलेंचा हा मुद्दा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना गर्भित इशारा दिला असून गोगावलेंनी त्यांच्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी. अन्यथा जिल्ह्यात महायुतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असा इशारा दिला आहे.
जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, गोगावलेंचा ज्या राणे यांच्या नेतृत्वात निवडून आले आज फक्त स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचा टोला लगावला आहे. तर त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत असनाता दीपक केसरकर यांनी देखील कोणतीच मध्यस्थी केली नाही, हे क्लेशदायक असल्याचेही सावंत यांनी म्हटलं आहे
नारायण राणे हे आमचे आदरस्थान असून त्यांच्या बद्दल जाहीर सभेत अशा पद्धतीने वापरलेले शब्द आणि वक्त्यव्य अत्यंत दुर्दैवी आहे. नारायण राणेंचा राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेते कौतुक करतात. त्यांचा एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आहे.
आता तर ते खासदार असून याआधी केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. पण अशा ज्येष्ठ नेत्यावर असंवेदनशील व आक्षेपार्ह भाषेत जबाबदार मंत्र्यांने आरोप आणि दावे करणे योग्य नाही. गोगावलेंच्या अशा वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील सावंत यांनी केला आहे.
मंत्री गोगावले यांच्या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यानंतर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया येत असून गोगावले यांनी खा. नारायणराव राणे यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा महायुतीच्या यापुढील चर्चा विसराव्यात. महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी एकट्या भाजपची नाही हे देखील ध्यानात घ्यावे, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी गोगावलेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांना माफी मागण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देखील दिला आहे. माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर ‘तिरडी आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. तसेच नारायण राणेंबद्दल बोलताना गोगावलेंनी तारतम्य बाळगावे, महायुतीचा भाग असूनही त्यांनी अशी वक्तव्य करू नये असादी दम भरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.