Ajay Singh-Ganesh Hukkeri
Ajay Singh-Ganesh Hukkeri Sarkarnama
विश्लेषण

Solapur News : कर्नाटकच्या विधानसभेत पोचले सोलापूरचे दोन भाचे....

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या निवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला चारीमुंड्या चीत केले आहे. या निवडणुकीत नेत्यांच्या घरीतील लोक किंवा नातेवाईक मोठ्या संख्येने जिंकले आहेत. त्याच पद्धतीने सोलापूरचे दोन भाचेही काँग्रेसच्या तिकिटावर कर्नाटकच्या विधानसभेत दिमाखदार विजय मिळवित पोचले आहेत. (Two bhacche of Solapur Win Karnataka Assembly Elections)

कर्नाटकातील (Karnataka) जेवरगी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांचे सुपुत्र अजयसिंह यांनी बाजी मारली आहे. ते काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. अजयसिंह हे बार्शी तालुक्यातील वैरागचे भाचे आहेत. तसेच, सोलापूरच्या माजी नगरसेविका दिवंगत प्रभावती मसरे यांचे भाचे गणेश हुक्केरी यांनीही काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला आहे. ते बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्या अर्थाने ते दोघेही सोलापूरचे (Solapur) भाचे आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंह यांचे चिरंजीव अजयसिंह यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील जेवरगी येथून ते दहा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. बार्शी तालुक्यातील वैराग येथील प्रकाशसिंह मरोड यांचे ते भाचे आहेत. तसेच, तुळजापूरमध्ये सध्या गटविकास अधिकारी म्हणून काम करणारे प्रशांतसिंह मरोड हे त्यांचे आतेभाऊ आहेत.

चिकोडीमधून विजयी झालेले काँग्रेस उमेदवार हुक्केरी हे सोलापुरातील तम्मा मसरे यांचे मावसभाऊ आहेत. सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू हे त्यांचे आतेभाऊ आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी मतदारसंघातून तब्बल ८१हजारांच्या मताधिक्क्याने हुक्केरी यांनी आपला विजय मिळविला आहे. गणेश हुक्केरी यांचे वडिल प्रकाश हुक्केरी हे एकदा खासदार म्हणून निवडून आले होते, तर पाच वेळी ते चिकोडीचे आमदार होते.

तीन सख्खे भाऊ झाले आमदार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तीन भावांनी विजय मिळविला आहे. या तीन भावांपैकी दोघांनी भाजपकडून, तर एकाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. यात सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला. यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. या वेळी त्यांनी जवळपास 60.42 टक्के मते मिळवली आहेत.

भालचंद्र जारकीहोळी हे अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला. रमेश जारकीहोळी यांनी गोकाक विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. याआधी देखील तेच या मतदारसंघातून निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT