Abhishek Ghosalkar Death Sarkarnama
विश्लेषण

Abhishek Ghosalkar Death: जालना, पुणे, उल्हासनगर अन् आता दहिसर...; महाराष्ट्र बनला 'गोळीबार' मैदान!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब-

Dahisar Firing News : थेट पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर राजकारणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा अभिषेक घोसाळकर या उध्दव ठाकरे यांच्या नेत्यांवर झालेल्या गोळीबाराने महाराष्ट्र हा गोळीबार मैदान बनला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार आता थोडे थोडे सुधारले असताना या राज्यांमध्ये कायद्याचे राज्य आल्याचे दिसत असताना महाराष्ट्र मात्र बिघडला असून हा सारा प्रकार चिंताजनक आहे.

या सर्व प्रकाराने राज्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाविकास आघाडीने सरकारवर गुंडगिरीला आश्रय देत असल्याचा आरोप केला. आता यामध्ये आणखी भर पडली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुण्यातील एका गुंडांचा फोटो आणि त्या गुंडानेच मंत्रालयाच्या आवारात केलेले रील पोस्ट करून सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर लगेच विजय वडेट्टीवार यांनी गुंड निलेश घायवळ यांचे मंत्रालय परिसरातील रील्स टाकून सरकारवर टीका केली आहे.

कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतल्याचा फोटो आपल्या एक्स या सोशल मीडीयावर पोस्ट केले होते. तसेच या फोटोंच्या माध्यमातून राज्यात गुंडाराज चालू असल्याचंही त्यांनी आरोप केला होता.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे फोटो खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेअऱ केले आहेत. या पोस्टमध्ये लिहीताना ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात गुंडाराज सूरू आहे. हे महाशय कोण आहेत ? त्यांचे नेमके कर्तृत्व काय ? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. पण मोदी- शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने आज काय अवस्था करून ठेवली आहे." असा थेट हल्ला संजय राऊतांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुण्यातील गुंड निलेश घायवळची रिल्स शेअर करताना वडेट्टीवारांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश घायवळचा मंत्रालयातील परिसरात तयार केलेला व्हिडीओ शेअर करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केली आहे. गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे अभिनंदन. " असाही टोला वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला आहे.

तसेच राज्यातील पेपरफुटी विरोधात परीक्षार्थी विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. तर नागपुरात आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू असताना इकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून दिले आहे. त्यामुळे हीच का ती “मोदी की गॅरंटी” ? असा परखड सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील एकूणच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे. पोलिसांचा वचक नसल्याने हे प्रकार घडत आहेत. पुण्यात गुंडांच्या वराती काढल्या खऱ्या पण हे गुंड इतके मस्तावाल आहेत की त्यांना आता कशाचीच भीती वाटत नाही. लोकांना आणि पोलिसांना मिशा पिळून ते दाखवत आहेत की आमचेच राज्य आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT