Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ठाकरे, पटोलेंच्या पोटातलं ओठावर; पवारांच्या मनात काय...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट करावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आघाडी देईल त्या चेहऱ्यांना पाठिंबा देऊ मात्र चेहरा द्यावा, असे ते म्हणाले. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तो निर्णय दिल्लीतील नेते ठरवतात, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे, पटोलेंनी एकाच व्यासपीठावर भूमिका स्पष्ट करूनही ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मात्र त्यावर जाहीर भाष्य करणे टाळले. त्यामुळे ठाकरे, पटोलेंच्या पोटातलं ओठावर आलं, तर पवारांच्या मनात नेमकं काय सुरूय, याचीच उत्सुकता ताणली गेली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यातून मोर्चे, यात्रांचे आयोजनाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका घेतली जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी वारंवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा, असा आघाडीतील नेत्यांच्या मागे तगादा लावला आहे. मुंबईतील संयुक्त बैठकीत मात्र ठाकरेंनी आघाडी देईल त्या चेहऱ्याला पाठिंबा देऊ, मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करण्याचे जाहीर आवाहनच केले.

ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या. ठाकरेंच्या मागणीनंतर त्याच व्यासपीठावरून काँग्रेसचे नाना पटोले Nana Patole यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असा राज्यात ठरत नसतो. तो निर्णय दिल्लीतील नेते घेतात, असे सूचक विधान करत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरे आणि पटोले यांच्यानंतर आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar बोलले. ठाकरे आणि पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे या मुद्द्यावर आता पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. पवारांनी मात्र या मुद्द्यावर बोलणेच टाळले. त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असावा, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले जाते. त्याला मात्र आघाडीतील काँग्रेसने नकार दिला आहे. त्यानंतर ठाकरेंनी दिल्ली दौराही केला. त्यावेळीही काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या भेटीत हा मुद्दा चर्चिला गेल्याचे बोलले जाते.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

राज्यात शिवसेनेची भाजपसोबत 25-30 वर्षे युती होती. आम्ही युती-युती म्हणत जागा वाटपाच्या बैठका घेत होतो. बैठकीत ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री असे ठरायचे. त्यातून एकमेकांचे आमदार पाडले जात होते. युतीत घेतलेल्या या अनुभवाची पुनरावृत्ती आता नकोय. त्यामुळे काय असेल ते ठरवा. त्याला आमचा पाठिंबा असेल. मग पुढे जाऊ, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT